बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना गुजरातमधून अटक केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडणारी आणि निर्भीडपणे बोलणारी राखी सावंत आता या हल्ल्याबाबत बोलली आहे. बिष्णोई गॅंगला विनंती करणारा राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत राखी सावंत म्हणाली, “बिष्णोई ग्रुप मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्हाला विनवणी करते की, कृपया असं करू नका. सलमानभाईने खूप जणांची घरं वाचवली आहेत. सलमान खानने अनेक गरीब लोकांचं भलं केलंय. बिष्णोई गँग तुम्हाला हे सगळं करून काय मिळणार आहे?”

हेही वाचा… सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर अरबाज खानची पहिली पोस्ट; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने काही लोक…”

राखी पुढे म्हणाली, “तुम्हाला माहीत आहे का की, ते किती मोठे देवता आहेत. माझी आई खूप आजारी होती तेव्हा त्यांनी खर्च करून माझ्या आईचं ऑपरेशन केलं आणि तिला वाचवलं. कोरोनाच्या वेळेस मला पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी मला मदत केली. एवढा चांगला माणूस कुठे भेटेल सांगा मला. बिष्णोई गँग मी तुमच्यासमोर हातच जोडू शकते. मी मोठ्या आवाजात हे सगळं बोलत नाही आहे.”

“त्यांनी स्वत:लग्न नाही केलं; पण दुसऱ्यांना मदत केली. ते अगदी सामान्य जीवन जगतात. त्यांना तसं जगू द्या. बिष्णोई गँग मी तुमच्यासमोर हात जोडते. कृपया त्यांना जगू द्या”, असंही राखी म्हणाली.

हेही वाचा… धोनीचा षटकार पाहून नेहा धुपिया झाली अवाक, तर करीना कपूरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत अटक केली आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून, या संदर्भात पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे.