छोट्या पडद्यावरील एकता कपूरच्या ‘क’या मालिकेतील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी.’ या मालिकेला संपून १९ वर्षे उलटली आहेत. मालिकेतील काही कलाकारांनी रियूनियन पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मालिकेत पायलची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री जया भट्टाचार्यने सोशल मीडियावर रियूनियनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. दरम्यान कलाकारांनी शिर्षक गीतही गायले असल्याचे दिसत आहे.

जयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या रियूनियन पार्टीमध्ये कलाकार सुमीत सचदेवा, कोमोलिका गुहा ठाकुरता, शक्ति सिंह, मुनि झा, हुसैन, संदीप बसवाना, ख्याति केसवानी, रितु चौधरी सेठ, जितेन लालवानी आणि इतक कलाकार उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान जयाने स्मृती इराणी आणि अपरा मेहता यांची आठवण येत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले. मालिकेत स्मृती इराणी यांनी तुलसी आणि अपराने सविता यांची भूमिका साकारली होती.

जयाने व्हिडीओ शेअर करताना ‘आम्ही… १९ वर्षे… अजूनही एकत्र आहोत’ असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान मालिकेतील स्मृतीची मुलगी शोभा उर्फ रितु चौधरीने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’च्या कालाकारांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने मालिकेतील आठवणींना उजाळा दिला आहे.

एकताच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेली ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका २००० साली छोटय़ा पडद्यावर दाखल झाली. तेव्हापासून ती जी सुरू झाली ती थांबायचे नावच घेईना. शंभर, दोनशे, चारशे करत हजार भाग झाले तरी ही मालिका एकता कपूरला थांबवावीशी वाटत नव्हती. स्मृती इराणी या मालिकेत सून म्हणून आली होती. त्यानंतर आई, सासू असं करत करत मालिकेने उडय़ांवर उडय़ा घेतल्या आणि ‘एकताकृपे’ने स्मृती ‘बा’च्या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचली. तोपर्यंत आजूबाजूच्या टेलिविश्वातही क्रांती झाली. रिअ‍ॅलिटी शोचे स्तोम मोजले तेव्हा कुठे एकताला तिच्या सगळ्याच ‘क’ मालिकांचा गाशा गुंडाळावा लागला. तेव्हा कुठे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका सरतेशेवटी संपली.