मणी रत्नम सध्या त्यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. सुप्रसिद्ध तमिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नियन सेल्वन’ या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. कथेच्या भव्यतेमुळे हा चित्रपट दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्थी, जयम रवी, त्रिशा अशा अनेक दिग्गज कलाकारांनी एकत्र काम केले आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

भारतातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या मणी रत्नम यांनी अनेक सुपरहिट चित्रपट तयार केले आहेत. त्यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या राय बच्चन हिने या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी १९९८ मध्ये ‘दिल’ से हा चित्रपट बनवला. या चित्रपटामध्ये सुपरस्टार शाहरुख खानने मुख्य पात्र साकारले होते. त्याच्यासह प्रीती झिंटा आणि मनीषा कोयराला यांनीही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. तेव्हा चित्रपटाला दोन राष्ट्रीय आणि सहा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. ‘दिल से’ या चित्रपटाची गाणी आजही फार लोकप्रिय आहेत.

आणखी वाचा – शाहरुख खानला दिलासा, चेंगराचेंगरी प्रकरणातील गुन्हा मागे

पोन्नियन सेल्वनच्या प्रमोशनसाठी मणी रत्नम मुंबईमध्ये आले होते. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना ‘तुम्ही आणि शाहरुख खान पुन्हा एकत्र कधी काम करणार आहात?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हसत ‘तुम्ही शाहरुखला हा प्रश्न विचारायला हवा’ असे म्हटले. पुढे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. ते म्हणाले, “माझ्याकडे उत्तम स्क्रिप्ट तयार असेल, तरच मी त्याच्याशी याबद्दल बोलू शकेन. चांगली स्क्रिप्ट हा मुद्दा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटत असतो. जर माझ्याकडे शाहरुखसाठी योग्य असलेली स्क्रिप्ट असेल, तर आम्ही पुन्हा एकत्र काम करु”

आणखी वाचा – हृतिक रोशनने दिले ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसण्याचे संकेत, म्हणाला “आधी हा चित्रपट मग…”

मणी रत्नम यांनी फार आधी पोन्नियन सेल्वन ही कादंबरी वाचली होती. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी या पुस्तकाच्या कथेवर आधारित चित्रपट तयार करायचा विचार केला होता. आता त्यांचे स्वप्न सत्यात उतरले आहे.