प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपट केले. पण छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवूनही ती मालिकांमध्ये फार काम करताना दिसली नाही. आता तिने यामागचं कारण सांगितलं आहे.

प्रियाने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. ‘दे धमाल’ या मालिकेत ती झळकली. तर त्यानंतर तिने ‘अधुरी एक कहाणी’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. तिने साकारलेल्या या भूमिकांचं खूप कौतुक झालं. पण ती मोठ्या पडद्यावर अधिक रमली. तिने ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘टाईमपास २’, ‘टाईमपास ३’, ‘वजनदार’ अशा विविध चित्रपटांमधून काम केलं. ती मुद्दामच मालिकांपासून लांब राहिली. आता याचं नेमकं कारण काय याचा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी ‘आभाळमाया’ आणि ‘अधुरी एक कहाणी’ या मालिका केल्या तेव्हा मी शिकत होते. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात काम केल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. २०१० साली मी ‘शुभंकरोती’ मालिकेत काम केलं. पण मी मालिका या माध्यमामध्ये रमू शकले नाही. ही मालिका संपल्यानंतर मी ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक, ट्रॅव्हल शो, ‘काकस्पर्श’, ‘टाईमप्लीज’ अशा वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये काम केलं. त्यानंतर आपण फक्त चित्रपटच करायचे हा माझा निर्णय पक्का होता. कारण मी रोज सकाळी उठून सेटवर जाऊन एकच भूमिका नाही साकारू शकत. तो माझा स्वभावच नाही आणि म्हणून मी मालिकांपासून लांब राहिले.”

हेही वाचा : ‘हा’ एक नियम मोडला म्हणून प्रिया बापटला आईने ठेवलं होतं घराबाहेर, आठवण सांगत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याच्या माझ्या निर्णयाला उमेशचा चांगला पाठिंबा होता. फक्त मराठी चित्रपटांमध्ये काम करून कोणाचं काही भागू शकत नाही. या माध्यमाची आर्थिक गणितं वेगळी असतात. त्यामुळे जेव्हा मी फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला उमेशने सांगितलं, मालिकांमध्ये काम करून पैसे कमावतो आहे त्यामुळे तू भूमिका निवडताना चोखंदळ राहा. तर दुसरीकडे मध्यंतरीच्या काळात मी कामामध्ये खूप व्यग्र होते. मी हिंदी प्रोजेक्टमध्ये काम करत होते. त्यामुळे त्याप्रमाणे आर्थिक गणितही बदलत होती. तेव्हा मग मी त्याला सांगितलं की आता तू चित्रपटांसाठी थांब. मालिकांमध्ये काम करू नकोस. नात्यात हा समतोल असणं महत्वाचं असतं.”