अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता त्यांनी शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावर पोस्ट केली आहे.
राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याची सक्ती केली होती. पण विरोधानंतर राज्य सरकारने फक्त अनिवार्य शब्द वगळून पाचवीपर्यंत हिंदी ही ‘तिसरी भाषा’ म्हणून शिकणं बंधनकारक केलं. जर २० मुलांनी एकत्र येऊन हिंदी ही तिसरी भाषा शिकायची नाही, असं सांगितल्यास त्यांना दुसरी भाषा शिकवली जाईल.
मागील काही दिवसांपासून सातत्याने शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात गदारोळ पाहायला मिळतोय. आता शरद पोंक्षे यांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टने लक्ष वेधले आहे.
शरद पोंक्षे यांची पोस्ट
“विरोध हिंदीला नाही, ती सक्तीचाही नाहीये.. फक्त पहिलीपासून ३ भाषांचं ओझं नको मुलांवर, विरोध त्याला आहे. पहिलीपासून मराठी भाषा फक्त. मराठी मातृभाषा सलगपणे ४ थी पर्यंत शिकूदेत की.. मग ५ वी पासून शिकायचंच आहे. जसे आम्ही शिकलो,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी फेसबूकवर केली आहे.

शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘अगदी बरोबर बोललात..खरं तर हिंदी भाषा शाळेत शिकवू नका असं फारच कमी जणांचं म्हणणं आहे.ती भाषा शिकवली जावी पण पाचवीपासून..पहिलीपासून नको..’, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर, ‘मातृभाषा राष्ट्रप्रेम शिकवते, मातृभाषेत विज्ञान, गणित शिकल्याने जपान, चीन खूप पुढे निघुन गेले. आणि मराठी म्हणजे अभिजात भाषा वैभव. वैभवशाली परंपरा असलेली. शिक्षण हे मातृभाषेतूनच पाहिजे, पाचवीनंतर हिंदी, इंग्रजी ठरवा. हिंदीच्या ऐवजी संस्कृत शिकवा, तिची नाळ मराठी भाषेशी खूप जवळीकीची आहे,’ अशी कमेंट शरद पोंक्षे यांच्या पोस्टवर नेटकऱ्याने केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयाला राज्यातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अनेक मराठी कलाकार यासंदर्भात पोस्ट करत आहेत. हेमंत ढोमे, समीर चौघुले, केदार शिंदे, महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी तसेच आता शरद पोंक्षे यांनीही शाळेत हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भात त्यांचं मत मांडलं आहे.