मराठी मनोरंजन सृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत ज्या लग्न कधी करणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. आता ऋतुजाच्या आईनेच लेकीच्या लग्नाबद्दल भाष्य करत त्यांना कसा जावई हवा हे सांगितलं आहे.
ऋतुजा बागवे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा नेटकरी तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारतात. पण सध्या तिला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आतापर्यंत कधी ऋतुजाच्या आई-वडिलांनीही तिला लग्न करण्यासाठी आग्रह केला नाही. आता अशातच तिच्या आईने ऋतुजाच्या लग्नाबाबत मनमोकळेपणाने भाष्य केलं.
आणखी वाचा : ‘बेस्ट’चा ऑनड्यूटी चालक मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दाखवलं दृश्य, म्हणाली…
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋतुजाची आई म्हणाली, “ऋतुजा वयात येताना मी तिला सांगितलं होतं की लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तू मुलगा निवड. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीशी तुला प्रीत होईल त्याच्याशी तू लग्न कर. कारण ते अखंड असतं. प्रीत असली की ती व्यक्ती आपल्याजवळ असली किंवा लांब असली तरीही ती आपल्या हृदयात कायम असते. त्यामुळे जोपर्यंत तुला प्रीत होणार नाही तोपर्यंत तू लग्न नाही केलं तरी चालेल.”
हेही वाचा : “जेव्हा लोक विचारतात, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा…” ऋतुजा बागवेची पोस्ट चर्चेत
पुढे त्या म्हणाल्या, “असा एखादा मुलगा तिच्या आयुष्यात यावा जो देवाने खरोखरच तिच्यासाठी बनवला आहे असं वाटावं. तो कधी यावा हे मी नाही सांगू शकत. पण जेव्हा केव्हा तिला गरज असेल तेव्हा तो तिच्या आयुष्यात आला पाहिजे असं मला वाटतं.” त्यामुळे आता ऋतुजाच्या आयुष्यात असा एखादा मुलगा कधी येणार याची तिचे चाहते वाट बघत आहेत.