Marathi Actress Road Accident Post : मराठी कलाकार हे अभिनयाशिवाय त्यांच्या सामाजिक बांधिलकीसुद्धा तितकेच ओळखले जातात. अभिनय क्षेत्रात सहभागी असण्याबरोबरच मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे समाजातील परिस्थितीबद्दलही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा अर्थकारण असो…मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मंडळी समाजातील एखादी घटना किंवा प्रसंग तसंच समस्यांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
अशीच सध्याची एक मोठी समस्या म्हणजे रस्ते अपघात. रस्ते अपघात ही भारतातील एक भीषण समस्या बनत चालली आहे. या रस्ते अपघातात अनेक कलाकार आणि राजकीय तसंच इतर क्षेत्रातील काही महत्त्वाच्या व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. अलीकडे वर्तमानपत्र, टीव्हीवर रोजच रस्ते अपघाताबद्दलच्या बातम्या पाहायला मिळतात. याच रस्ते अपघाताबद्दल मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिच्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने चालकांच्या अपुऱ्या झोपेमुळे अपघात होत असल्याबद्दल सांगितलं आहे. तसंच या पोस्टमधून तिने चालकाने पुरेशी झोप घ्यावी असा सल्लाही दिला आहे. प्रवासादरम्यान झोप आल्यास शर्मिला स्वत: हे असं करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.
शर्मिला शिंदे इन्स्टाग्राम पोस्ट
शर्मिला या पोस्टमध्ये असं म्हणते, “मी माझ्या बॅगमध्ये कायम एक छोटी उशी, एक बेडशीट आणि एक शाल ठेवतेच. काल रात्रभर एका चित्रपटाचं शूटिंग करून आज सकाळी सात वाजता गाडी चालवत घरी आले. झोप येऊ लागली म्हणून बोरिवलीजवळ एक सुरक्षित ठिकाण बघून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली. गाडीची सीट खाली केली आणि तोंडावर पांघरून घेऊन एक झोप काढली.”
यापुढे शर्मिला असं म्हणते, “हे सांगण्याचं कारण म्हणजे मी एका अपघाताची बातमी वाचली आणि यापूर्वी सुद्धा अशा बऱ्याच बातम्या वाचल्या आहेत. त्यात डोळा लागून झोपेत लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मी वाचलेल्या एका बातमीत चालक वाचला होता; पण रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक मुलगा मृत पावला. त्यामुळे मला हे सांगावंसं वाटलं.”
यानंतर तिने या पोस्टद्वारे आवाहन करत असं म्हटलं आहे की, “कृपया झोप येत असेल तर लगेच गाडी बाजूला घेऊन एक झोप काढा. कोणी काहीही म्हणूदेत आपण झोपायचं.” यानंतर तिने गमंतीत “झोप पूर्ण करायची आहे. हे लिहिल्याशिवाय झोप येत नव्हती.” असं म्हणाली आहे. दरम्यान, शर्मिलाच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्समध्ये तिच्या या कृतीचं आणि तिने सल्ल्याचं कौतुक केलं आहे.