Gauri Kulkarni Entry Shiva Serial: ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपली तरी आजही मालिकेतील कलाकारांची नेहमीच चर्चा होताना दिसते. अभिनेत्री गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. संजनाची भाची व अभिषेकची मैत्रीण गौरी ही भूमिका तिने साकारली होती. तिच्या या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.
गौरी कुलकर्णीची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री
आता अभिनेत्री गौरी कुलकर्णीची झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा‘ मालिकेत एन्ट्री झाली आहे. तिने अर्चना ही भूमिका साकारली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अर्चना व चंदन यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अर्चना तिची बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी गॅरेजमध्ये येते, त्यावेळी तिथे चंदन असतो. त्याला वाटते त्याची बायको दिव्या तिचा राग बाजूला ठेऊन परत आली आहे, त्यामुळे तो भावूक होतो.
चंदनला भावूक झालेले पाहिल्यानंतर अर्चना तिने तोंडाला बांधलेला रुमाल काढते व ती दिव्या नसल्याचे सांगते. तसेच तिचे नाव अर्चना असल्याचेदेखील सांगते. चंदनला रडताना पाहून ती देखील भावूक होते. आता अर्चना या पात्रामुळे मालिकेत काय गमतीजमती घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता ‘आई कुठे काय करते’ नंतर ‘शिवा’ मालिकेतून ती पुन्हा एकदा सर्वांचे मन जिंकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘शिवा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवाने पुन्हा एकदा आशूला मोठ्या संकटातून वाचवल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच आशूला त्याच्या कामासाठी पुरस्कारदेखील मिळाला.
आता लवकरच मालिकेत नवीन वळण येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. शिवाने पुढे शिक्षण घ्यावे, अशी संपूर्ण देसाई कुटुंबाची इच्छा आहे. मात्र, शिवाला शाळेत जायचे नाही, तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे नाही. आता आशू, सिताई, रामभाऊ, ऊर्मिला काकू व घरातील इतर मंडळी शिवाची कशी मनधरणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच कीर्तीच्या नवऱ्याचे सुहासचे सत्य सर्वांसमोर आले. शिवाने त्याला कानाखाली मारल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्याला घराबाहेरचा रस्तादेखील दाखवला. या सगळ्यात कीर्तीने स्वत:ला वाचवण्यासाठी सर्वांसमोर सुहासला त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला. त्याने आशूला व देसाई कुटुंबाला का फसवले असे विचारत तिनेही त्याच्या कानाखाली मारली. मात्र, सुहास व कीर्ती अजूनही एकत्र असल्याचे पाहायला मिळाले. झालेल्या अपमानानंतर सुहासने देसाई कुटुंबाचा बदला घेण्याचे ठरवले आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.