Shiva New Twist: सध्या ‘शिवा’ ही मालिका मोठी चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत नवीन वळण आले असून सुहासचे सत्य सर्वांसमोर आले आहे, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, ही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘शिवा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी रामभाऊंनी आशूवर ऑफिसमधील एका कामाची जबाबदारी दिली होती. त्याला एका मीटिंगमध्ये हजेरी लावायची होती. त्यामध्ये देसाई कंपनीचे प्रतिनिधित्व करायचे होते आणि ते कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळवून द्यायचे, अशी ही जबाबदारी दिली होती. मात्र, त्याला ते कॉन्ट्रॅक्ट मिळू नये म्हणून सुहासने अंजलीच्या मदतीने मोठी योजना आखली होती. त्यानंतर त्याने अंजलीच्या मदतीने आशूला तुरुंगातदेखील पाठवले होते. आशूने जबरदस्ती केली अशी खोटी तक्रार अंजलीने केली होती. मात्र, शिवाने आशूची निर्दोष सुटका केली, त्यानंतर आशूच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्टदेखील मिळाले.
आता सिताईने त्यांचे हे यश साजरे करण्यासाठी एका पार्टीचे नियोजन केले होते. तिथे अंजलीदेखील आली. अंजलीला पाहून सुहास व कीर्तीला धक्का बसला. अंजली सर्वांसमोर सुहासचे सत्य सांगते. त्याच्याच सांगण्यावरून तिने आशूविरुद्ध खोटी तक्रार केल्याचे अंजलीने सर्वांसमोर सांगितले. तिला बहिणीच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने ती या कारस्थानात सहभागी झाल्याचे अंजलीने सांगितले. त्यानंतर शिवाने त्याला मारल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, कीर्तीनेदेखील तिचे नाव या सगळ्यात येऊ नये म्हणून तिने सुहासला बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतरदेखील शिवाने सुहासला त्रास दिल्याचे पाहायला मिळाले.
घरातून हकालपट्टी केल्यानंतर सुहास घेणार बदला
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सुहासने देसाई कुटुंबाचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले की, सुहासच्या मनात बदल्याची भावना आहे. सुहास रागात म्हणतो, “तुम्हा सगळ्यांना हे खूप महागात पडणार आहे. शिवा, तू प्रत्येकवेळी सगळ्यांना वाचवत आली आहेस ना? आता बघ मी काय करतो.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की कीर्ती व सुहास एकत्र आहेत. कीर्ती सुहासला म्हणते, तिला तर मीसु्द्धा सोडणार नाही. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने कीर्ती व सुहासमध्ये अजूनही बदल्याची भावना अशी कॅप्शन दिली आहे, त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार, सुहास व कीर्ती बदला घेण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.