राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. यासाठी करोना संसर्ग रोखण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे पालन न करणारे मोठ्याप्रमाणावर जबाबदार असल्याचे दिसत आहे. या पुणे, मुंबई या प्रमुख शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेच्यावतीने अधिक कठोर भूमिका घेण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातलेल्या व्यक्तीने जर २०० रुपये दंड भरण्यास नकार दिला किंवा यासाठी वाद घातला, तर आता त्या व्यक्तीस तासभर रस्ता झाडावा लागू शकतो किंवा भिंतींवरील चित्र साफ करण्याची शिक्षा देखील होऊ शकते. ही शिक्षा बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन उप-कायद्यांनुसार लागू केली जाईल. ज्यानुसार रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून सार्वजिक कामं करून घेण्याचा अधिकार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

तसेच, अधिकाऱ्याने हे देखील सांगितले आहे की, नियम मोडणारे जे व्यक्ती ही कामे करण्यास नकार देतील, त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल होऊ शकते. मास्क न घालणारे अनेकजण २०० रुपये दंड भरण्यास नकार देत असल्याचे दिसून येत असल्याने व नियमांचे केले जाणारे उल्लंघन रोखण्यासाठी, प्रशासनास अशा प्रकारची सार्वजनिक कामं त्या व्यक्तींकडून करून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी म्हणाले की, पैसा मिळवणं हा आमचा उद्देश नाही, परंतु नागरिकांनी सार्वजिनक ठिकाणी मास्कचा वापर करावा यासाठी हे करावं लागत आहे. लोकांनी या मागील गांभिर्य ओळखून मास्कचा वापर करावा यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. रस्ते सफाईसह सार्वजनिक कामांव्यतिरिक्त आम्ही नियम मोडणाऱ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील करणार आहोत. त्याचवेळी आम्ही सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा हा संदेश सर्व माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहचवत आहोत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीएमसीकडून मास्कच्या वापराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियासह होर्डिंग्जचा देखील वापर केला जात आहे.