राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळात तांत्रिक बाबींमुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील अवकाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याच्या आकस्मिकता निधीतून ५३८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मंजुरी दिली.

राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर कोणताही पक्ष सत्तास्थापन करु शकला नव्हता. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती. या परिस्थितीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेता येत नव्हते. तसेच त्यांना मदतीसाठी राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याने लवकरात लवकर सरकार स्थापन होईल आणि आपल्यासाठी मदत मिळेल अशी आशा या शेतकऱ्यांना होती.

दरम्यान, शनिवारी अचानक भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या समर्थक आमदारांसोबत नवे सरकार स्थापन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री सहाय्यक निधीतील धनादेशावर सही करीत एका गरजू महिलेला १ लाख २० रुपयांची मदत दिली.

या मदतीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आकस्मिता निधीतून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५३८० कोटी रुपयांच्या निधीला सोमवारी मंजुरी दिली.