सध्या भारतात मोडी लिपी नाही तर फक्त मोदी लिपी दिसते असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्कील शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य केलं. अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव यांची स्तुती केली. अच्युत पालव यांनी सुलेखनासाठी केलेलं काम अफाट आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. २६ जुलैचा जो पाऊस मुंबईत झाला होता त्यावेळी त्यांचं अनेक साहित्य भिजलं. मात्र त्यांनी सुलेखनासाठीची मेहनत सुरुच ठेवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

माझं अक्षर चांगलं आहे याचं महत्त्वाचं कारण आहे बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील. पूर्वी मोडी लिपी होती. आता फक्त मोदी लिपी दिसते आहे हा भाग वेगळा. असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्किल शब्दात भाष्य केलं तेव्हा एकच हशा पिकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे २३ जानेवारीला मनसेच्या मेळाव्यात त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. याआधी ते आज अच्युत पालव यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी सुलेखन,  अक्षर चांगलं असणं आणि मोडी लिपी याबाबत भाष्य केलं. अच्युत पालव यांचे आणि माझे अरेतुरेचे संबंध आहेत. मात्र घरात आम्ही एकमेकांना तसं संबोधतो असंही राज यांनी स्पष्ट केलं.