भिवंडी काल्हेर परिसरात एका कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. दिलीप अमर माझी (७) आणि रूबी अमर माझी (५) ही भावंडं तसेच राज विनोद सोनी अशी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरालगत असलेल्या महिंद्रा कंपनीच्या गोदामातील मोकळ्या जागेत ही मुले खेळत होती. खेळता खेळता ते कार पाहण्यासाठी गेले आणि दरवाजा उघडून आत शिरले. मात्र दरवाजा उघडता न आल्याने ते आतमध्येच अडकून पडले. श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सकाळी घरातून खेळायला बाहेर पडलेली मुले बराच वेळ झाला तरी परत न आल्याने त्यांच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेही सापडू शकली नाहीत. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात मुले हरविल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ शोध सुरू केला. तेव्हा महिंद्रा कंपनीच्या गोदामातील कारमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास ही मुले मृत अवस्थेत आढळली.