मुंबई : ‘मिशन मेरिट’ उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका व खान ॲकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘गणित गुरुवार’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गुरुवारी रात्री ८ ते १० दरम्यान किमान ३० मिनिटे खान ॲकॅडमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर गणिताचा सराव करता येईल. विद्यार्थ्यांनी गणित विषयात शिस्त, सातत्य आणि प्रावीण्य मिळवावे, यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, स्पर्धेच्या युगात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशस्वी व्हावे यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करीत असतो. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर यांच्या सूचनेनुसार दरवर्षी महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘गणित गुरुवार’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणिताच्या नियमित सरावातून प्रावीण्य निर्माण होते. या विषयाबाबत आंतरराष्ट्रीय संशोधन व खान ॲकॅडेमीच्या आकडेवारीनुसार, आठवड्यातील किमान ३० मिनिटे सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय शैक्षणिक प्रगती होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेतच नव्हे, तर घरीही अभ्यासाची सवय निर्माण होईल. दरम्यान, प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षक इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना खान ॲकॅडमी प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून गणिताचा सराव आणि असाइनमेंट पूर्ण करण्याची आठवण करून देतील. खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घालवलेला वेळ व त्यांनी सराव केलेल्या कौशल्यांची नोंद केली जाईल. शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांमध्ये याबाबत पाठपुरावा केला जाईल. पालक – शिक्षक सभा (पीटीएम), व्हॉट्स ॲप ग्रुप व शिक्षक – पालक संवादामुळे हा उपक्रम शालेय वेळेनंतरही प्रभावी होईल आणि प्रत्येक घरात शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचा सातत्याने अभ्यास करण्याची गोडी निर्माण करणारा असेल. प्रत्येक आठवड्याला केलेल्या सरावामुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास निर्माण होईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले.