मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १८ वरील भारत गौरव पर्यटन ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ व्या राज्याभिषेकाच्या वर्धापन दिनानिमित्त सहा दिवसांची गौरव यात्रेचा शुभारंभ झाला आहे. महाराजांच्या वारसा स्थळांना भेट देण्यात येणार आहे.

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव ही पर्यटन रेल्वे चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विशेष पर्यटन ट्रेन पॅकेज सुरू केले आहे. भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे पर्यटन ट्रेन चालवल्या जातात. मार्च २०२५ मध्ये रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना जोडण्याचे काम आधीच सुरू आहे आणि ही ठिकाणे भारत गौरव सर्किट यात्रेद्वारे एकमेकांशी जोडली जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर, ९ जून रोजीपासून गौरव यात्रेची सुरुवात झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळाशी संबंधित किल्ले, राजवाडे, युद्धभूमी अशी अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळे आहेत. ही रेल्वेगाडी रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी यासारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देईल. विशेष भारत गौरव सर्किट यात्रेमुळे प्रवाशांना, विशेषतः तरुणांना या भूमीच्या इतिहासाशी जोडण्याची संधी मिळेल आणि समृद्ध मराठा इतिहासाचा भाग असलेल्या या ठिकाणांना भेट देण्याची आणि जवळून बघण्याची संधी मिळेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एकूण ७१० प्रवासी या प्रवासात सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये ४८० इकॉनॉमी (शयनयान), १९० कम्फर्ट (तृतीय वातानुकूलित) आणि ४० सुपीरियर (द्वितीय वातानुकूलित) वर्गात असतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रावण विशेष यात्रा १९ जुलै रोजी सुरू होणार

भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंग व इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने नवीन सहलीचे आयोजन केले आहे. आयआरसीटीसीच्या पश्चिम विभाग मुंबई कार्यालयाने १९ जुलै २०२५ रोजी सोलापूरहून सुरू अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा सुरू होणार आहे. भारत गौरव रेल्वेगाड्यांमध्ये विनावातानुकूलित शयनयान, तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा, द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा असतील. तसेच ही रेल्वेगाडी पर्यटक रेल्वेगाडी दिसण्यासाठी, प्रवासी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, रेल्वेगाडीच्या बाहेरील बाजूस भारतीय स्मारके, शिल्पे, नृत्य प्रकार सादर केले जातील. या रेल्वेगाडीची सुमारे ६०० ते ७०० पर्यटक बसू शकतील, एवढी क्षमता आहे. यासह रेल्वेगाडीत उद्घोषणा, सीसीटीव्ही कॅमेरे, जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पेंट्री कार बसवण्यात आली आहे, असे आयआरसीटीसीद्वारे सांगण्यात आले.