मुंबई : राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये येत असलेल्या अडचणी तात्काळ दूर करुन हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावावेत आणि नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण करावेत, आणि या प्रकल्पांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही फडणवीस यांनी आज केली. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेशही दिले.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई उपनगर, ठाणे व पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित प्रकल्पांचे कंत्राटदार उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो लाईन – २ बी चे काम सुरु असून ही मेट्रो डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार आहे व या मार्गावर १९ स्थानके असतील. या प्रकल्पाचे काम ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात यावे आणि स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. श्यामनगर स्थानिकाच्या जमिनीसंदर्भातील अडचणी नगरविकास विभागाने १५ दिवसांत सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प अहोरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. रेंगाळलेल्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ चे काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९ पर्यंत तर वरळी येथील प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. एन.एम.जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्यात यावा आणि ‘बीडीडी चाळ’ पुनर्वसन प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना फडणवीस यांनी केली.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण करावेत. ऐरोली-कटई नाका फ्रीवे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांवर येणार आहे. त्याच्या जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तात्काळ निधी देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा २३.८ किमी रस्ता बांधण्याचे काम सुरू असून यातील १९ किमीचा रस्ता तयार झाला आहे व हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेमार्फत मागाठाणे-गोरेगाव डी.पी.रोडचे सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहणाबरोबरच प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणारे निवासस्थानाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. प्रकल्पाग्रस्तांकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात यावा. फिल्म सिटी गोरेगाव ते खिंडीपाडा मुलुंड येथे दुहेरी बोगद्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी जास्त मनुष्यबळ नियुक्त करावे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील नागरिक नवी मुंबई विमानतळाकडे सहज पोहचू शकणार आहेत. वर्सोवा ते दहिसर ते भाईंदर या मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून खार जमिनीची परवानगी मिळाली असून हा प्रकल्प ३० डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे टप्पे करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.
फडणवीस यांनी महावितरण,जलसंपदा आणि सिडको यांच्यामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांचाही आढावा घेतला.
