मुंबई : एखाद्या राज्याचा विकास करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा ओळखून नियोजन करावे लागते. हेच जाणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शहरी तसेच ग्रामीण भागांच्या विकासावर भर दिला आहे. या विकासपर्वाचा लेखाजोखा लोकसत्ताच्या ‘मुंबई पुढचे पाऊल…’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर नेण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा निर्धार फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केला आहे. त्यादृष्टीने मुंबई महानगर क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात आकारास येत असलेले पायाभूत प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्वसामान्य जनतेसाठी पायाभूत सुविधांचे मोठे जाळे विणत असताना उद्योग क्षेत्रातही गुंतवणूक वाढली पाहिजे, याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.
परिणामी महाराष्ट्राने पायभूत सुविधांचे निर्माण आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये संपूर्ण भारतात चांगली मजल गाठली आहे. मुंबई आणि महानगर क्षेत्रासाठी वर्तमानच नव्हे तर भविष्यातील पायाभूत गरजांचा विचार करून साकारण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा वेध ‘मुंबई – पुढचे पाऊल…’ यातून घेण्यात आला आहे. मुंबई महानगरात म्हाडा, सिडको अशा यंत्रणांकडून सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यात येत आत्त. त्याचबरोबर जुन्या जीर्ण चाळींच्या पुनर्विकासातून भव्य गृहसंकुलांची निर्मिती करण्यात येत आहे.
मुंबईला झोपडीमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांनी वेग घेतला आहे. त्या माध्यमातून गरिबांना हक्काचे घर देण्यात येत आहे. अशा प्रकल्पांची दृष्टिक्षेपातील माहिती या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये आहे. मुंबईत बांधण्यात येत असलेल्यl डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहितीही या पुस्तकात समाविष्ट आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, वांद्रे वर्सोवा सागरी सेतू, मुंबई किनारी रस्ता, विरार अलिबाग कॉरिडोर, शक्तिपीठ महामार्ग, ऑरेंज गेट बोगदा, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग अशा अनेक पायाभूत प्रकल्पांनी आकार घेण्यास सुरुवात केली असून त्यातून भविष्यातल्या राज्यातील दळणवळण शक्तीचा अंदाज बांधता येतो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पर्याय म्हणून मेट्रो मार्गिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे शहरांतर्गत प्रवास अतिशय सुकर होणार असून उपनगरी रेल्वेवरील भार कमी होणार आहे. या सर्व प्रकल्पांचा परिचय करून देणारी सांख्यिकी आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुस्तकात समाविष्ट आहे.