मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील डोंगरी कारशेड रद्द करत इतरत्र हलविण्यात यावे अशी आक्रमक भूमिका उत्तन -डोंगरीतील स्थानिकांनी घेतली आहे. डोंगराची, जंगलाची हानी करून, वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आणून कारशेड बांधली जात असून त्यामुळे भविष्यात पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवणार आहेत. त्यामुळे डोंगरीतील कारशेड रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्या मागणीसाठी स्थानिकांनी आता जनआंदोलनाची तयारी दाखवली आहे. गरज पडल्यास न्यायालयीन लढाईची तयारी तेथील स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींची आहे. एकूणच आरे कारशेडप्रमाणे आता डोंगरी कारशेडचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न सुरुवातीपासून वादात अडकला आहे. मेट्रो ९ ची कारशेड राई, मुर्धा, मोर्वा गावात प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र या गावातील स्थानिकांनी त्याला जोरदार विरोध केल्याने राज्य सरकारने अखेर कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील डोंगराळ जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील कार्यवाही करून ती जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात आली. त्या जागेवर कारशेडच्या कामास सुरुवात करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएने आता झाडे कापण्यासाठीचे प्रस्ताव मिरा-भाईंदर महानगर पालिककडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५०० झाडे कापण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. आता आता दुसऱ्या टप्प्यात ९९०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडून पालिकेला पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावावर स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी जोरदार आक्षेप घेत मोठ्या संख्येने आपल्या सूचना-हरकती नोंदविल्या आहेत. एकूणच आता कारशेडसाठी १२ हजारांहून अधिक झाडे कापली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ही संख्या वाढण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आता डोंगरी, उत्तन परिसरातील गावकर्यांनी, स्थानिकांनी या कारशेडला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडप्रमाणे या कारशेडलाही आता विरोध होत आहे. कारण झाडे कापण्यास विरोध होत आहेच, पण आता डोंगरी कारशेड रद्द करण्याची आणि ते इतरत्र हलविण्याची मागणी स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी उचलून धरली आहे.
कारशेडची जागा ही डोंगराळ आहे. तेथे बिबट्या, कोल्हा, घोरपड, विविध प्रकारचे साप, मुंगूस, रानडुक्कर आदी संरक्षित वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. विविध प्रकारचे पक्षी आहेत. महत्त्वाचे म्हणजे मिरा-भाईंदर शहरात आता मोठ्या संख्येने सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. अशावेळी या परिसरात डोंगरीतील हे जंगल एकमेव आॅक्सीजनचा नैसर्गिक स्त्रोत आहे. अशावेळी जर जंगलच नष्ट केले तर पर्यावरणाची मोठी हानी होणार असून वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात येणार आहे. त्यामुळे आमचा या कारशेडला विरोध आहे. डोंगरीतील कारशेड रद्द करत ते इतरत्र हलवावे अशी आमची मागणी असल्याचे डोंगरी-पालखडीतील स्थानिक डॅनी जाॅनी घोन्साल्वीस यांनी सांगितले. तर आमच्या गावाच्या एका बाजूला डम्पिंग ग्राऊंड असून त्याच्या दुर्गंधीने आम्ही आधीच हैराण आहोत. पण त्यातल्या त्यात दुसर्या बाजूला मोठे जंगल असल्याने आम्हाला प्राणवायू मिळतो. हे जंगल नष्ट झाले तर आम्ही काय करणार असा प्रश्न डोंगरीतील स्थानिक फादर आॅस्कर मेन्डोसना यांनी उपस्थित केला आहे. तर आमच्या गावातून मोठ्या संख्येने ९९०० झाडांच्या कत्तलीच्या प्रस्तावाविरोधात सुचना-हरकती सादर झाल्या आहेत, त्यावर पालिका काय निर्णय घेते यावर आमची पुढील भूमिका अवलंबून असेल असेही त्यांनी सांगितली. त्याचवेळी उत्तन मिरा-भाईंदरमधील पर्यावरणप्रेमींनी गरज पडल्यास त्याविरोधात न्यायालयीन लढाईची तयारी असल्याचेही सांगितले. तेव्हा आता हा विरोध पाहता राज्य सरकारची, एमएमआरडीएची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
कारशेडसाठी ३७१६ झाडे कापली जाणार असून उर्वरित ७५९० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. मात्र आतापर्यंत करण्यात आलेल्या पुनर्रोपणातील १० टक्केही झाडे जगलेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डोंगरीत झाडांची कत्तल होणार असून पर्यावरणाचा र्हास होणार असल्याचे यानिमित्ताने वनशक्ति संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी सांगितले.