मुंबई : राज्यात वनीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. पुढील वर्षीही १० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट असून, वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली, तरच ही मोहीम यशस्वी होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्राने गेल्या आठ वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यापूर्वी ३३ कोटी व ५० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करता येईल. वृक्ष लागवडीकडे लक्ष ठेवताना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व विभागांनी जागा तसेच दर्जेदार रोपे निश्चित करावीत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा आणि सामाजिक संस्थांनाही सहभागी करून घ्यावे. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याने वृक्षलागवड आवश्यक असून, पुढील वर्षी एक कोटी झाडे लावण्याचा विचार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.