Mumbai Local Train Accident : आज मुंबईजवळीळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लोकलमधील गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत असताना ही घटना घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेनंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, याआधीही अशा प्रकारच्या अपघाताच्या घटनेत काही प्रवशांना आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र, तरीही रेल्वे प्रशासन याबाबत काही ठोस पावलं उचलंत नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
एका अहवालावरून हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, मुंबईतील उपनगर रेल्वे ट्रॅकवर २०२३ मध्ये एकूण २,५९० लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार दररोज सरासरी सात मृत्यू होतात. बहुतेक मृत्यू रुळ ओलांडल्याने आणि धावत्या गाड्यांमधून पडल्याने झाले आहेत. या आकडेवारीनंतर रेल्वे गाड्या आणि प्लॅटफॉर्म व ट्रॅक दरम्यान संरक्षण भिंती बांधणे यासह आणखी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, तरीही याबाबत ठोस पावलं रेल्वे प्रशासनाकडून उचलले गेले नसल्याचं बोललं जात आहे.
२०२३ मध्ये मुंबईतील उपनगर रेल्वे ट्रॅकवर एकूण २,५९० जणांना आपला जीव गमवावा लागला. जो त्या आधीच्या २०२२ च्या २,५०७ च्या तुलनेत किंचित जास्त आहे. २,५९० मृत्यूंपैकी १,६५० जणांचा मृत्यू मध्य रेल्वेवर, तर ९४० जणांचा मृत्यू पश्चिम रेल्वेवर झाला. जीआरपीच्या आकडेवारीनुसार एकूण मृत्यूंपैकी १,२७७ लोक रेल्वे रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडले. तसेच ५९० लोक धावत्या ट्रेनमधून पडून मृत्युमुखी पडले. नोंदीनुसार १२१ लोक रेल्वे रुळांवर आत्महत्या करून मृत्युमुखी पडले आणि ५२९ मृत्यू हे ट्रेनमध्ये किंवा स्थानकांवर प्रवास करताना नैसर्गिक कारणांमुळे मृत्युमुखी पडले.
तसेच त्याव्यतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि रेल्वे गाड्यांमधील धोकादायक रित्या पडून १० जणांचा मृत्यू झाला, तसेच खांबाला धडकल्याने चार जणांचा आणि गाड्यांच्या छतावर प्रवास करताना १४ जणांचा विजेचा धक्का बसला. रेल्वे रूळ ओलांडल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर ठाण्यात १७९ जणांचा मृत्यू तर बोरिवलीमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर १५४ जणांचा मृत्यू झाला. अनधिकृत रेल्वे क्रॉसिंगमुळे झालेल्या १,२७७ बळींपैकी १,१६८ पुरुष आणि १०९ महिला होत्या. रेल्वे रूळावरून पडून झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या कल्याणमध्ये ११४ तर वसईमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला. एकूण ५९० जणांपैकी ५३५ पुरुष तर ५५ महिला होत्या.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात आरटीआय कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या एका जनहित याचिकेत रेल्वेने बंद दरवाज्यावरील लोकल गाड्या चालवल्या पाहिजेत अशी विनंती करण्यात आली होती. त्यात झवेरी यांनी म्हटलं होतं की, उच्च न्यायालयाने रेल्वेला प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक दरम्यान सीमा भिंती आणि कुंपण बांधण्याचे निर्देश दिले होते. जेणेकरून अनधिकृतपणे ट्रॅक ओलांडणे आणि रेल्वे परिसरात अतिक्रमण रोखता येईल. मात्र, याचं पुढे काय झालं? हा प्रश्न आहे.
मुंबई उपनगर रेल्वे ट्रॅकवर २०२४ मध्ये किती मृत्यू झाले?
मुंबईतील उपनगर रेल्वे ट्रॅकवर झालेल्या मृत्यूची २०२३ ची आणि २०२४ ची आकडेवारी पाहता २०२४ मध्ये ही संख्या काहीसी घटली. २०२३ मध्ये २,५९० तर २०२४ मध्ये २,४६८ एवढी रेल्वे ट्रॅकवर झालेल्या मृत्यूची आकडेवारी टाइम्स ऑफ इंडीयाने एका वृत्तात दिलेली आहे. या आकडेवारीनुसार, जखमींची संख्या २०२३ मध्ये २,४४१ होती, तर २०२४ मध्ये २,६९७ एवढी होती. तसेच रुळ ओलांडण्याच्या कारणास्तव १,१५१ मृत्यू झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, ट्रॅक ओलांडणे हे मृत्यूंचं सर्वात मोठं कारण राहिल्याचंही सांगितलं जातं.