How to reach Samruddhi Mahamarg from Thane Kalyan: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज समृद्धी महामार्ग अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्धाटन झालं. त्यामुळे आता मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा टप्पा केवळ ८ तासांत पार करणं शक्य होणार आहे. अर्थात, प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावरील अंतर ८ तासांचं असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी समृद्धी महामार्गाच्या प्रवेशापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईकर, ठाणेकर किंवा कल्याणकरांना टप्प्याटप्प्यानेच प्रवास करावा लागणार आहे.
कसा आहे समृद्धी महामार्ग?
आज इगतपुरी ते आमणे या शेवटच्या ७६ किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण झालं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाविषयीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.
१. समृद्धी महामार्गासाठी एकूण खर्च ६१ हजार कोटी
२. एकूण लांबी – ७०१ किमी
३. वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी एकूण १०० प्रकारच्या विशिष्ट संरचनांची उभारणी, त्यात डोंगर-दऱ्यांमधल्या ७३ व्हायाडक्टचा समावेश.
४. देशात पहिल्यांदाच वाहनांसाठी ८ ओव्हरपास आणि ९२ अंडरपास
५. समृद्धी महामार्गावर ३२ मुख्य पूल तर ३१७ लहान पूल
६. एकूण ५९ ओव्हरपास आणि २२९ अंडरपास
७. देशातला आत्तापर्यंतचा सर्वात रुंद बोगदा इगतपुरीचा
८. समृद्धी महामार्गावर पादचाऱ्यांसाठी १८० ओव्हरपास व २२४ अंडरपास
९. उत्तम अभियांत्रिकीचे नमुने ठरतील असे एकूण २५ इंटरचेंज
१०. २०२२ मध्ये ११ डिसेंबरला पहिला टप्पा, २०२३ मध्ये २६मे रोजी दुसरा टप्पा, २०२४ मध्ये ४ मार्चला तिसरा टप्पा तर २०२५ मध्ये ५ जूनला चौथा व शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण
११. आज उद्घाटन झालेला शेवटचा टप्पा ७६ किलोमीटरचा
१२. शेवटच्या टप्प्यात ५ जुळे बोगदे, त्यांची एकूण लांबी ११ किलोमीटर
१३. १०० टक्के आगविरोधी यंत्रणा. बोगद्यातील तापमान ६० अंशांवर गेल्यास स्वयंचलित पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान ३० अंशांपर्यंत खाली आल्यावर ही यंत्रणा बंद होईल.
१४. शेवटच्या टप्प्यात इगतपुरी, फूडघर आणि आमणे हे तीन प्रमुख इंटरचेंज
१५. अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे
१६. १२ कोटी सिमेंटची पोती, ७ लाख मेट्रिक टन स्टील आणि १३ कोटी घनमीटर भराव, ८ कोटी घनमीटर खोदकाम झालं. त्यातला ६ कोटी घनमीटर माल पुन्हा वापरण्यात आलेला आहे.

मुंबईतून कसे पोहोचाल समृद्धी महामार्गापर्यंत?
प्रत्यक्ष समृद्धी महामार्ग आमणेजवळील इंटरचेंजपासून सुरू होतो. शहापूरनजीकच्या या इंटरचेंजचं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अंतर जवळपास ८० ते ९० किलोमीटर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मुंबईतून आमणे येथील समृद्धी महामार्गावरील पहिल्या इंटरचेंजपर्यंत पोहोचण्यासाठी अंदाजे दोन ते अडीच तास लागण्याची शक्यता आहे. मुंबईहून आमणे इंटरचेंजपर्यंत पोहोचण्यासाठी ठाणे मार्गेच जावं लागेल. मुंबई-ठाण्याहून कल्याणमार्गे नाशिक महामार्गापर्यंत आधी जावं लागेल. तिथून चिंचवली तर्फ सोनळेनजीक समृद्धी महामार्गाचा पहिला एंट्री पॉइंट आहे. या ठिकाणाहून उजवीकडे वळल्यास कुकसेमार्गे काही अंतरावर समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी तुम्ही आमणे इंटरचेंजपर्यंत पोहोचता.
मुंबईहून इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून आधी ठाण्यापर्यंत जाऊन तिथून मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरपर्यंत वाहनाने जावं लागेल. तिथे आमणे इंटरचेंज या समृद्धी महामार्गावरील पहिल्या इंटरचेंजच्या माध्यमातून आपल्याला या महामार्गावर प्रवेश करता येईल.
कल्याणहून कसे पोहोचाल समृद्धी महामार्गावर?
ठाण्याहून कल्याणमार्गेदेखील आमणे इंटरचेंजपर्यंत पोहोचणं शक्य आहे. कल्याणहून आधी शहापूर आणि तिथून आमणे इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश करता येईल. आमणे इंटरचेंजवर एकदा का प्रवेश केला, की तिथून समृद्धी महामार्गावरून थेट नागपूरपर्यंतचं अंतर पार करता येईल. मध्ये २५ ठिकाणी समृद्धी महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी इंटरचेंज तयार करण्यात आले आहेत.