मुंबई : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दहा मानाच्या पालख्या आणि वारकरी, तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी एकादशीनिमित्त १८ जून ते १० जुलै या कालावधीत पंढरपूरला जातना व परत येताना पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना पथकरात सूट देण्यात आली आहे. तसेच आषाढी एकादशीनिमित्त जादा वाहतूक करणाऱ्या एसटीला पथकर माफी देण्यात आली आहे.

‘आषाढी एकादशी २०२५’, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, संबंधित परिवहन विभाग यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व परिवहन विभागामध्ये स्टीकर्स उपलब्ध करून देतील. तसेच हे स्टीकर्स / पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी वेगळी नोंदणी किंवा स्टिकर्स घ्यावे लागणार नाही. भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक विभागातून भाविकांच्या मागणीप्रमाणे पथकर माफीच्या पासचे वाटप करण्यात येणार आहे. तर, महाराष्ट्राच्या विविध भागांतून पंढरपूरच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवरील सर्वच पथकर नाक्यांवर एसटी बसगाडीला पथकरातून सूट देण्यात येणार आहे.

सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात असणार आहे. तसेच परिवहन विभागालाही जादा बस सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून पथकर नाक्यांजवळ महामार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद आदींचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात येणार आहेत.

आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग, तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते / महामार्गावर रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई – कोल्हापूर – बंगलोर, पुणे – सोलापूर राष्ट्रीय मार्गावर क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईमधील शीव – पनवेल महामार्ग, मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई – बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे – सोलापूर, पुणे – सातारा – कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग; तसेच मुंबई – पुणे – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई – पुणे – सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते आदींवरील खड्डे बुजवणे, दुरुस्ती कामे, सूचना फलके लावण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणारे वारकरी, भाविकांना प्रवासादरम्यान त्रास होणार नाही.