मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक अभ्यासक्रामाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला २० मेपासून सुरुवात सुरुवात केली असून नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरातील ९६ हजार ३०० विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी केली असून, लवकरच एक लाख नोंदणीचा टप्पा ओलांडण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना २० मेपासून १६ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करून त्यांची पडताळणी आणि अर्ज निश्चिती करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्यानंतर निश्चित होणारे अर्ज हे संस्थास्तरावरील फेरीसाठी विचारात घेण्यात येणार आहेत. संकेतस्थळावर १८ जून रोजी तात्पुरती गुणवत्तायादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर तात्पुरत्या गुणवत्तायादीमध्ये दर्शविलेल्या माहितीबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास १९ ते २१ मेदरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवता येणार आहे. त्यानंतर अंतिम गुणवत्तायादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. मात्र १६ मेपासून करण्यात आलेल्या अर्ज नोंदणीमध्ये ९ जूनपर्यंत तब्बल ९६ हजार ३०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. दररोज साधारण तीन हजार विद्यार्थी नोंदणी करीत आहेत. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांतच एक लाख नोंदणीचा टप्पा ओलांडला जाईल, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सांगितले.
अडचणी दूर करण्यासाठी मदत क्रमांक
प्रवेश अर्ज भरण्याबरोबरच प्रवेश प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास ती दूर करण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून मदत क्रमांक ७६६९१००२५७ / १८००३१३२१६४ उपलब्ध करण्यात आले आहेत. हा मदत क्रमांक सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.
पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीत बदल
आतापर्यंत पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या राबविण्यात येत होत्या. मात्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सदर अभ्यासक्रमांच्या चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. तसेच दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने भरलेला पर्याय अर्जामध्ये बदलण्याची संधी मिळणार आहे. मागील फेऱ्यांमध्ये पर्याय अर्ज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना चौथ्या फेरीमध्ये पर्याय अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी तीन फेर्यांनंतर प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येत होती. आता चौथ्या फेरीअंती प्रवेश अंतिम करण्यात येणार असून, दुसऱ्या फेरीनंतर अभ्यासक्रमांचा प्रवेश अंतिम ठरेल.