मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव अदानी आणि सरकारने आखल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी धारावी पुनर्विकासाविरोधात लढा उभारण्याचा, आंदोलन करण्याचा निर्णय घेत आता ठाकरे गट मैदानात उतरला आहे. मुलुंड येथे सोमवारी ठाकरे गटाकडून एका सभेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आमदार आदित्य ठाकरे नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमिनी लाटल्या जात असून या प्रकल्पात काय त्रुटी आहेत, या प्रकल्पाचा काय परिणाम होणार यासंबंधीचे एक सादरीकरण ते यावेळी करणार आहेत. या सभेत धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

राज्य सरकारने धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला असून पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. तर या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला देण्यात आले आहे. अदानी समुहाला धारावीकरांचा विरोध असताना, ५०० चौरस फुटांसह अन्य मागण्या मार्गी लागण्यात आलेल्या नसतानाही हा प्रकल्प पुढे रेटला जात असल्याचा आरोप धारावीकर करीत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत अपात्र धारावीकरांचेही धारावीबाहेर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेत सरकार अदानी समुहाला मुंबईतील विविध ठिकाणची अंदाजे १२०० एकर जागा देणार आहे.

आतापर्यंत १२०० एकरपैकी ५५० एकर जागा धारावीसाठी देण्यात आलेली आहे. यात मुलुंड, कुर्ला मदर डेअरीच्या जागेसह अन्य ठिकाणच्या जागेचा समावेश आहे. धारावीकरांचे मुलुंड, कुर्ला आणि अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यास मुलुंड, कुर्लावासियांचा जोरदार विरोध आहे. मात्र हा विरोध डावलून सरकार धारावीसाठी जागा देत आहे. एकूणच धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. हा डाव उधळून लावण्याचा निश्चय करीत आता ठाकरे गट मैदानात उतरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात सोमवारी, ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ठाकरे गटाकडून एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड, कुर्ला, कांजुरमार्ग, विक्रोळी, मालाड आणि धारावीसाठी जमिनीची मागणी करण्यात आलेल्या ठिकाणचे रहिवासी या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे ॲड. सागर देवरे यांनी दिली. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून धारावी पुनर्विकासात काय त्रुटी आहेत, हा प्रकल्प मुंबईवर काय परिणाम करणार, या प्रकल्पाच्या नावाखाली कशी मुंबई लुटली जात आहे याचे एक सादरीकरण करणार असल्याचेही देवरे यांनी सांगितले. आता धारावी पुनर्विकासाविरोधातील आंदोलन तीव्र करण्यात येणार असून ही सभा म्हणजे या आंदोलनाचा पहिला टप्पा असणार आहे. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.