इंद्रायणी नार्वेकर
मुंबई : महापालिकेने मोठा गाजावाजा करून सव्वा चार कोटी खर्च करून मुंबईत बसवलेल्या भूमिगत कचरापेटय़ांची दुर्दशा झाली. त्यामुळे या प्रकल्पावर टीका झाली होती. मात्र, महापालिकेच्या घनकचरा विभागाने आता आणखी भूमिगत कचरापेटय़ा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध रुग्णालयांच्या आवारात १५ ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ा बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईतही कचरापेटय़ा बसवण्यासाठी जागेचा शोध घेण्यात येत आहे.
भरलेल्या कचरापेटय़ा, त्यातून येणारी दुर्गंधी या समस्येतून मुंबईकरांची सुटका व्हावी म्हणून महापालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी भूमिगत कचरापेटय़ांचा पर्याय शोधला; पण जमिनीखाली सर्वत्र उपयोगिता वाहिन्यांचे (युटिलिटी केबल्स) जाळे असल्यामुळे या अवघ्या दोन घनमीटर आकाराच्या कचरापेटय़ांसाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे महापालिकेने २०१९ मध्ये सव्वा चार कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात २० ठिकाणी ओला व सुका कचरा यासाठी प्रत्येकी दोन अशा ४० भूमिगत कचरापेटय़ा बसवल्या होत्या. मात्र, जागेअभावी संपूर्ण मुंबईसाठीचा हा प्रकल्प रखडला, तर कचरापेटय़ाही विशेष वापरात आल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात रुग्णालयांच्या आवारात भूमिगत कचरापेटय़ा बसवण्याचा निर्णय घेतला होता. रुग्णालयांच्या आवारात १५ कचरापेटय़ांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यातच आता तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण मुंबईत पुन्हा एकदा भूमिगत कचरापेटय़ा लावण्याचे ठरवले असून विभागांमध्ये कचरापेटय़ा बसवण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सर्व विभाग कार्यालयांना भूमिगत कचरापेटय़ांसाठी जागा सुचवण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीचे कोटय़वधी पाण्यात भूमिगत कचरापेटय़ांचा प्रयोग पालिकेने केला होता; पण देखभालीअभावी काही ठिकाणी या कचरापेटय़ांची दुर्दशा झाली आहे.
हेही वाचा >>>धारावी पुनर्विकासाची किनार की पक्षांतर्गत नाराजी? काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
काही ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ांतील कचरा गाडय़ांमध्ये टाकण्याची यंत्रणा बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी कचरा साठतो. त्यानंतर प्रचंड दुर्गंधी पसरते. देखभालीचा अभाव, यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे यापूर्वी भूमिगत कचरापेटय़ांवर खर्च केलेले कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत.
जागेची पाहणी करूनच निर्णय..
कचरापेटीत कचरा टाकल्यानंतर तो पुन्हा रस्त्यावर पसरला जातो. त्यावर पर्याय म्हणून बृहन्मुंबईत विविध ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरीही आणखी भूमिगत कचरापेटय़ा बसवण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयांनी जागा सुचवल्यानंतर त्या जागेच्या खाली उपयोगिता वाहिन्यांचे जाळे नाही ना, हे पाहण्यासाठी त्या जागांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर जागेची निवड केली जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत पूर्व उपनगरातील काही विभागांनी जागा सुचवली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नव्याने निविदा काढताना नियुक्त होणाऱ्या संस्थेला भूमिगत कचरापेटय़ांचा पुरवठा करणे, त्या कार्यान्वित करणे आणि त्यांची देखभाल- दुरुस्तीही करावी लागणार असल्याची माहिती घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.