मुंबई : आगामी काही दिवसांत मोसमी पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना आजपासून सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः १४ आणि १५ जून रोजी या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडू आणि दक्षिण महाराष्ट्रादरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर उत्तर ओडिशा आणि जवळच्या भागात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून, ही स्थिती दक्षिण महाराष्ट्राकडे सरकत आहे. परिणामी, राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. या कालावधीत प्रामुख्याने दक्षिण कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १२ ते १७ जून या कालावधीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आजपासून सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबई, तसेच ठाणे परिसरात शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर सर्वाधिक असेल. या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल शक्य
यंदा नैऋत्य मोसमी वारे लवकर दाखल झाले असले तरी मागील दोन आठवड्यांपासून त्यांचा वेग मंदावला आहे. मुंबई, अहिल्यानगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागात मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल थांबली आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असून शनिवारपासून मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मोसमी वारे वाटचाल करण्याची शक्यता आहे.
राज्यात मे महिन्यात मुसळधार
यंदा मे महिन्यात संपूर्ण राज्यात अपेक्षापेक्षा जास्त पाूस पडला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात सार्वाधिक पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार १ ते ३१ मे या कालावधीत सिंधुदुर्गमध्ये ५६४.७ मिमी पावसाची नोंद झाली.