मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यातील पावसामुळे चांगलीच वाढ झाली आहे. सातही धरणात मिळून २६.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा आहे. पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात तसेच आसपासच्या जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्यामुळे दोन तीन दिवसातच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात १८ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एरव्ही जून महिन्यात पाणीकपातीची वेळ येत असली तरी यंदा जून महिन्यात मुंबई महापालिकेची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे.
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी पाणीसाठा अत्यंत खालावला होता व साडे पाच टक्क्यांवर गेला होता. तर त्याच्या आधीच्यावर्षी हाच पाणीसाठा सात टक्के होता. त्या तुलनेत यंदा धरणात तिप्पट चौपट पाणीसाठा जमा झाला आहे.
गेल्या सोमवारी १७ जूनपासून चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात ही वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ८.६० टक्के असलेला पाणीसाठा आठवड्याभरातच २६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. खालावलेल्या पाणीसाठ्यात भरघोस वाढ झाल्यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला देखील दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पाऊस खूप लांबत चालला होता. जून महिन्यात पाऊसच पडत नसल्यामुळे धरणांतील पाणी तळ गाठू लागत. त्यामुळे राखीव साठ्याचा वापर करणे, पाणी कपात करणे हे उपाय मुंबई महापालिका प्रशासनाला करावे लागत होते.
पावसाला पुरेशी सुरूवात होत नाही तोपर्यंत अक्षरशः पाणीपाणी करावे लागत होते. यंदा मात्र पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे धरणांत पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या आठवड्यात मुंबई महापालिकेने उर्ध्व वैतरणा धरणातून पाणी उचलण्यास सुरुवात केली होती मात्र पाऊस चांगला पडू लागल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आल्याची माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी सातही धरणात मिळून ३ लाख ८८ हजार ५२३ दशलक्षलीटर म्हणजेच २६,८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे.
गेल्यावर्षीही उन्हाळ्यात राखीव साठ्याचा वापर करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आली होती. जून २०२४ मध्ये पाणीसाठा ५ टक्क्यांपर्यंत खालावला होता. तेव्हा राखीव साठ्याचा वापर सुरू करण्यात आला होता. तशीच वेळ यंदाही आली होती. मात्र पावसाने मुंबई महापालिकेला दिलासा दिला आहे.
कोणत्या धरणात किती पाणीसाठा
उर्ध्व वैतरणा …….३१.०४ टक्के
मोडक सागर ….४४.२२ टक्के
तानसा …..२९.१३ टक्के
मध्य वैतरणा …..२५.०३टक्के
भातसा ……. २१.७९ टक्के
विहार…. ३९.७१ टक्के
तुळशी ….३८. ३३ टक्के
एकूण ……२६.८४ टक्के
गेल्या तीन वर्षातील धरणसाठा
२२ जून २०२५ ….२६.८४ टक्के
२२ जून २०२४ ……५.३१ टक्के
२२ जून २०२३ ……७.०९ टक्के