मुंबई : यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. सामान्यत: मे महिना हा मुंबईसाठी कोरडा समजला जातो आणि वळवाच्या पावसाची क्षुल्लक नोंद होते. मात्र, यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली.
मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याअगोदर पावसाने जोर धरला होता. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत जून महिन्यात सरासरी ५०० मिमीच्या आसपास पाऊस अपेक्षित असतो. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
सामान्यत: मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो. यंदा मात्र मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला. यंदा साधारण १५ दिवस अगोदरच मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाला. दरम्यान, मे महिन्यात पडलेल्या पावसाने जूनमधील सरासरी ओलांडली आहे. जूनमध्ये किती पाऊस पडेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत असह्य उकाडा
सध्या मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोसळणाऱ्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानातही सध्या चढ – उतार सुरू आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी ३२.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भात पावसाचा अंदाज
विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाचा जोर राहील. तर राज्याच्या इतर भागात पाऊस कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथ आहे. मोसमी वाऱ्यांची अरबी समुद्रातील सीमा मागील पाच दिवसांपासून तर बांगालच्या उपसागरातील सीमा मागील तीन दिवसांपासून एकाच भागात होती. मोसमी वाऱ्यांची सीमा शनिवारीही मुंबई, अहिल्यानगर, आलीदाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. दरम्यान, विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वाशीम आणि बुलढाणा भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदीया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही पुढील तान ते चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.