मुंबई : बेलासिस पुलालगतच्या बाजारातील सात मासळी विक्रेत्या महिलांचे महानगरपालिका प्रशासनाने ताडदेव येथील तुळशीवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या मंडईत पुनर्वसन करण्यात आले. मात्र, उर्वरित महिला बेलासिस पुलालगतच्या बाजारातच व्यवसाय करत होत्या. महानगरपालिकेने या मासळी विक्रेत्यांच्या गाळ्यांवर मंगळवारी तोडक कारवाई केली. दरम्यान, महापालिकेने कोणत्याही पूर्वसूचनेविना कारवाई केली. तसेच मासळी विक्रेत्यांकडील मासे व अन्य सामान फेकून दिल्याचा आरोप मासळी विक्रेत्यांनी केला आहे.
बेलासिस पुलाच्या बांधकामात लगतच्या बाजारातील मासळी विक्रेत्या महिलांचे व्यवसाय अडथळा ठरत होते. त्यामुळे महानगरपालिकेने वैध कागदपत्रे आणि अनुज्ञापत्र असलेल्या महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. पुनर्वसनाचा तिढा सोडविण्यासाठी ९ डिसेंबर २०२४ रोजी महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयात पालिका अधिकारी आणि मासळी विक्रेत्या महिलांमध्ये बैठक झाली. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत वैध कागदपत्रे आणि अनुज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना मासळी विक्रेत्या महिलांना करण्यात आल्या. त्यांनतर २८ महिलांनी महापालिकेकडे कागदपत्रे सादर केली. पडताळणीनंतर ७ मासळी विक्रेत्या महिला पुनर्वसनासाठी पात्र असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान, ताडदेवमधील तुळशीवाडी येथील महापालिकेच्या मंडईत त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, अन्य महिलांना पर्यायी जागा नसल्याने त्यांनी बेलासिस पुलालगतच्या बाजारातच व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, महानगरपालिकेने मंगळवारी संबंधित मासळी विक्रेत्या महिलांच्या गाळ्यांवर तोडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान महिलांचा मासळी साठा आणि अन्य सामग्रीचे मोठे नुकसान झाले. या महिलांकडे बाजार परवाने असूनही त्यांच्या व्यवसायावर पूर्वपरवानगीशिवाय कारवाई करण्यात आल्याचा आरोप मासळी विक्रेत्या महिलांनी केला आहे. या घटनेमुळे मच्छिमार समाजामध्ये नाराजी पसरली असून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी महिलांनी मंगळवारी ताडदेव पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
बेलासिस पुलावर अनेक दशकांपासून मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मासळी विक्रेत्या कोळी महिलांना देण्यात आलेले परवाने हे फेरीवाल्यांचे परवाने होते. वैध कागदपत्रे असलेल्या ७ महिलांचे पुनर्वसन करताना महिलांचे फेरीवाला परवाने वगळून बाजार परवाने म्हणून नोंद करण्यात आली आहे. याच धर्तीवर मागील अनेक दशकांपासून मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उर्वरित १६ कोळी महिलांनाही बाजार परवाने देण्यात यावे, अशी मागणी मच्छिमार समाजाकडून होत आहे.