मुंबई : मुंबईत आमदारांना म्हाडाची घरे देण्यावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मुंबईत केवळ आमदारांनाच घरे नकोत, तर त्या योजनेत साहित्यिक, कलाकार, पत्रकार आणि सर्वसामान्यांनाही सोडत पद्धतीने घरे द्यावीत, अशी सूचना पवार यांनी केली. त्यानुसार तशी सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी लोकसत्ताला दिली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी मुंबईत म्हाडाची ३०० घरे आमदारांना देण्याची घोषण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या भाषणात त्याचा पुनरुच्चार केला. परंतु सरकार आमदारांना म्हाडाची मोफत घरे देणार, अशी उलटसुलट चर्चा सुरु झाली. त्यावर मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या आमदारांना घरे मिळणार नाहीत, तर त्या बाहेरील जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील आमदारांसाठी ही योजना असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. मुंबईत आमदारांना घरे देण्याची घोषणा वादग्रस्त ठरल्याने सोमवारी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आमदारांना घरे देण्याबाबत पवारसाहेबांची कोणताही नकारात्मक भूमिका नव्हती, तर केवळ आमदारांनाच नको, तर त्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार व सर्व सामान्यांचाही समावेश करावा, अशी सूचना त्यांनी केली. आमदारांसाठी जी प्रस्तावित योजना होती, तिची व्याप्ती वाढविण्यास सांगितले. त्यानुसार सर्वसमावेशक योजना तयार करुन, त्यात आमदारांचा कोटा असेल आणि सर्वानाच सोडतपद्धतीने घरांचे वाटप केले जाईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली. मुंबईत आमदारांना म्हाडाची मोफत घरे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी घरे या पूर्वी कधीच मोफत दिलेली नाहीत, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. आमदारांसाठी ३०० घरांची घोषणा केली असली तरी, ही योजना मुंबई महानगर प्रदेशाच्या बाहेरील, विशेषत ग्रामीण भागातील आमदारांसाठी असल्याने त्यांची संख्या फारच कमी असेल. आता शरद पवार यांच्या सूचनेप्रमाणे सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शरद पवार, वळसे पाटील यांच्यात आयपीएलवर चर्चा दरम्यान सोमवारी शरद पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबत चर्चा झाली. बैठकीला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. आयपीएलकडून जवळपास ११ कोटी रुपये मुंबई पोलिसांचे येणे बाकी आहे, त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत कोणताही राजकीय चर्चा झाली नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी नंतर माध्यमांशी बोलतना सांगितले.