चाळीस वर्षाच्या राजकारणात मी कोणाला हार घातला नाही, कोणाचे फलक लावले नाहीत, स्वतःचेही लावले नाहीत. तरीही मी निवडून आलो. पुढच्या निवडणुकीतही मी काही फलक, कट आऊट लावणार नाही, कोणाला चहापाणी देणार नाही. मत द्यायचे तर द्या. लोकांना काम करणारे नेते हवे असतात आणि त्यांना ते मत देतात असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक लढवण्याचे सुतोवाच केले.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात गडकरी बोलत होते. अंधेरी पश्चिम,सी.डी. बर्फीवाला हॉल येथील मेयर हॉल मध्ये हा कार्यक्रम शनिवारी झाला.आपल्या भाषणात गडकरी यांनी या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता,देशासाठी कसा होईल,टाकाऊ पासून त्याचे रूपांतर संपत्तीत कसे होईल यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमलात आणाव्यात असे आवाहन केले.
गेली ९६ वर्षे कार्यरत असलेली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कुशल मनुष्यबळ पुरवते. या संस्थेच्या एलजीएस,एलएसजीडी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, हॉस्पिटल मॅनेजमेंट,फायनान्स मॅनेजमेंट या विविध पदविका आभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना या समारंभात पदवीका प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंचावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक (निवृत्त प्रशासकीय अधिकारी) डॉ.जयराज फाटक, संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, नियामक मंडळाचे सदस्य विजय साने, निवृत्त प्रशासकीय अधिकारी गोविंद स्वरूप, संस्थेच्या डॉ.स्नेहा पळणीटकर,उत्कर्षा कवडी,रवीरंजन गुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
अमिताभ बच्चन यांची तक्रार
नगरपालिका महापालिकामध्ये जेवढी गुणवत्ता हवी तेवढी गुणवत्ता दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात जुहू अंधेरीमध्ये पाणी भरत असल्याचे सांगितले. समुद्रापेक्षा मुंबईची पातळी खाली आहे. त्यामुळे पाणी भरणारच पण जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन जर नगरपालिका आणि महानगरपालिकेला दिले तर हा प्रश्न राहणार नाही. त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही. तर ते काम कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी केला.