मुंबई : नाशिक परिसरात ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ची कांदा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. पण, कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वीच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली गोदामे भरून ठेवली आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या आता फक्त कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ची फसवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत, अशी तक्रार कांदा उत्पादक अतिश बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ यंदा नाशिक परिसरातून तीन लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे. बाजार समित्या किंवा खासगी बाजारातून थेट कांदा खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी केली होती. पण, थेट कांदा खरेदी करण्याची आमची तयारी नाही, असे सांगून यावेळी तरी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याचा निर्णय ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने घेतला आहे.
उभय संस्थांसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदी करणार आहेत. प्रत्यक्षात कांदा खरेदी सुरू झालेली नाही, तरीही खरेदीची परवानगी मिळालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची गोदामे भरलेली आहेत. त्यामुळे ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ने कांदा खरेदी सुरू झाल्याची घोषणा केली तरीही त्याची खरेदी फक्त कागदावरच होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी १४ ते १५ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करून गोदामात साठवणूक केली आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या २०- २१ रुपये प्रति किलो दराने खरेदी केल्याचे सांगून नाफेड आणि एनसीसीएफची फसवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे सात – बारा ही जमा केले असून, कांदा खरेदी कागदोपत्रीच होईल, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गैरव्यवहार थांबवावा
कांदा खरेदीचे काम मिळालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून गोदामे भरून ठेवली आहेत. आता फक्त आपल्या ओळखीच्या शेतकऱ्यांच्या नावाने बिले तयार केली जातील. या गैरव्यवहारात शेतकरी उत्पादक कंपन्या, नाफेड, एनसीसीएफचे अधिकारी सहभागी आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी अतिश बोराडे यांनी केली आहे.