मुंबई : सातारा, पुणे आणि अहिल्यानगरमधील १४ ठिकाणी शंभर मिलीमीटरहून जास्त म्हणजे अति मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक १६३.५ मिमी पाऊस पडला आहे. फलटणमधील चार, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यात दोन आणि पुणे जिल्ह्यातील दौंडमधील पाच आणि शिरूरमधील दोन ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २५ मे रोजी सकाळी साडेआठ ते सोमवार, २६ मे रोजी सकाळी साडेसाठ, या २४ तासांत राज्यातील १४ ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाला आहे. फलटणमध्ये १६३.५ मिमी, श्रीगोंद्यातील बेलवंडीत १३९ मिमी, फलटणमधील वाठारमध्ये १३५.२५, दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड, दौंड आणि गिरिममध्ये ११७.५, शिरूरमधील निमगाव, न्हावरेत आमि पारगावमध्ये १११.५ मिमी, श्रीगोंद्यातील केळगावमध्ये ११०.२५ मिमी, बारामतीतील पांढरेत १०४.७५, फलटणधील राजळेत १०४.७५ आणि कोळकीत १०२.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईसह पुणे, सातारा, सोलापूर, रायगडमध्ये पूरस्थिती
मुसळधार पावसामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे बारामतीत २५ घरांची पडझड झाली आहे. बारामतीमधील ८० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. भ्रमणध्वनी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. साताऱ्यातील ३० नागरिकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. एनडीआरएफचे एक पथक साताऱ्यात तैनात करण्यात आले आहे. सोलापुरातील माळशिरस येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या सहा जणांनी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत.