“भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान ३ च्या यशाचे कौतुक आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल असेच काम आहे. या यशाबद्दल इस्रोच्या संपूर्ण टीमचे मनःपुर्वक अभिनंदन. पण, चंद्रावर यान पाठविणाऱ्या आपल्या देशात जातीयवाद, जातीय द्वेष आणि त्याला बळी पडणाऱ्या मृत्यूचे काय? या वास्तवाबद्दल आपण कधी बोलणार आहोत?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (२० ऑगस्ट) ट्वीट करत देशातील महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर मांडून देशांतर्गत व्यवस्थेची यादीच मांडली.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अजूनही भारतात अनेक ठिकाणी हाताने मैला उचलला जातो. हे लाजिरवाने काम आजही सुरूच आहे. जातीय भेदभाव, दलित, आदिवासी, ओबीसींवरील अत्याचाराच्या, भेदभावाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.”

“भाजपा-आरएसएसकडून दलित, बहुजनांवर दडपशाही”

“मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ले, त्यांची वाढती असुरक्षितता, बलात्कार, लैंगिक अत्याचार, स्त्रिया व मुलींवरील हिंसाचाराचे वाढते प्रमाण, तुटपुंजी व आवाक्याबाहेरची आरोग्य सेवा, गरिबी व बेरोजगार युवकांची प्रचंड वाढत जाणारी संख्या, मूलभूत सोयीसुविधा नसलेला यात पिळला जाणारा सर्वसामान्य तरुण, भाजपा-आरएसएसकडून दलित, बहुजनांवर केली जाणारी दडपशाही, त्यांचे शोषण याबद्दल जरा स्वतःलाच विचारुया की, आपल्याला या वास्तवाबद्दल अभिमान आहे का?” असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला.

हेही वाचा : “सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये…”, मोदी-अदाणींचं नाव घेत प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोणते रॉकेट आपल्याला विद्वेष, जातीयवाद आणि मृत्यूपासून दूर नेणार?”

“कोणते रॉकेट आपल्याला विद्वेष, जातीयवाद आणि मृत्यूपासून दूर नेणार आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आणि देशातील जात, वर्ग व्यवस्थेवर बोट ठेवले.