मुंबई पोलिसांनी आपल्या चातुर्याने अनेक गंभीर गुन्ह्य़ांची उकल केली असली तरी अद्याप २०१२ मधील २८ खून प्रकरणांचा शोध लावण्यात त्यांना यश आलेले नाही. या हत्या कुणी आणि कशासाठी केल्या याचे गूढ अद्याप कायम आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१२ मध्ये मुंबईत २१४ जणांच्या हत्या झाल्या होत्या. त्यापैकी १८६ प्रकरणांचा छडा लावून पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांना अटक केली. परंतु २८ हत्या प्रकरणांचे गूढ अद्याप कायम आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा अद्याप त्या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
अपुरे मनुष्यबळ, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे तपास नीट करता येत नाही, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. यापैकी अनेक प्रकरणांत तपास सुरू असून लवकर आरोपी पकडले जातील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
या चिमुकल्यांचे मारेकरी कोण?
२०१२ या वर्षांच्या सुरुवातीलाच कुलाबा कफ परेड परिसरात चिमुरडय़ांचे अपहरण आणि हत्येने मुंबई हादरली. करिश्मा चव्हाण (३), एन्जल शर्मा (२) आणि जागृती पटेल (३) या तीन चिमुरडय़ांच्या एका पाठोपाठ हत्या झाल्या. लैंगिक अत्याचार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. या सीरियल किलरचा शोध अद्यापही लागलेला नाही.
पाच तरुणींच्या मृतदेहांचे गूढ
विविध भागांत खुनांचे सत्र सुरू असताना मुंबईत तरुणी आणि महिलांचे मृतदेह आढळून आले. त्यांची हत्या करून मृतदेह गोणीत भरून फेकण्यात आले होते. पवई, शिवाजी नगर, कुरार, सांताक्रूझ आणि आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पाच जणींचे मृतदेह आढळले होते. एकामागोमाग एक असे पाच जणींचे मृतदेह आढळ्याने त्यामागे सीरियल किलरचीही शक्यत वर्तविण्यात आली होती. या महिला अंदाजे २० ते ३५ वर्षांच्या आहेत. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे मारेकऱ्यांचाही शोध लागलेला नाही.
४ वरिष्ठ नागरिकांच्या हत्या
ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या हत्या गांभीर्याने घेत गृहमंत्र्यांनी त्यांच्या संरक्षणासाठी विविध उपापयोजना केल्या आहेत. तरी अद्याप चार ज्येष्ठ नागरिकांच्या हत्यांचा छडा लागलेला नाही. माहीम येथील रोहिदास राऊत (६५), कांदिवली येथील माणिकचंद जैन (६०), बीकेसी येथील मुमताझ अली (६०) आणि पंतनगर येथील दक्ष दफ्तरी (६५) यांच्या हत्या आणि त्यांचे मारेकरी पोलिसांसाठी आव्हान बनल्या आहेत.
सीमा परबचे मारेकरी अद्याप फरार
मालाडच्या प्रगती नगर येथे राहणारी सीमा परब (२३) ही तरुणी २७ मार्च २०१२ रोजी सकाळी कामावर जात असताना भररस्त्यात तिघांनी तिच्यावर चाकूने वार केले. तिचा मारेकरी महेश गुजर अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले. पण अद्याप तो सापडलेला नाही. मालवणी येथील ज्युली रॉड्रीक्स (४०) या महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आली होती. त्याचाही सुगावा लागलेला नाही. अंधेरी येथे मॉडेल विदुषी दास (२३) हिच्या हत्येप्रकरणात तपास करून काहीच हाती लागले नाही. त्यामुळे डीएन नगर पोलिसांनी तो अपघाती मृत्यू असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
मुंबईतील २८ खुनांचे गूढ अद्याप कायम सुहास
मुंबई पोलिसांनी आपल्या चातुर्याने अनेक गंभीर गुन्ह्य़ांची उकल केली असली तरी अद्याप २०१२ मधील २८ खून प्रकरणांचा शोध लावण्यात त्यांना यश आलेले नाही. या हत्या कुणी आणि कशासाठी केल्या याचे गूढ अद्याप कायम आहे.
First published on: 24-02-2013 at 03:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Still secret of 28 murders in mumbai