मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील (टीआयएसएस) ११५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी टाटा एज्युकेशन ट्रस्टने पाच कोटी रुपये निधी दिला आहे. त्यामुळे गतवर्षी निधीअभावी ११५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर असलेली टांगती तलवार मार्च २०२६ पर्यंत टळली आहे. यापूर्वी वेतन तरतूद ३१ डिसेंबर रोजी संपल्याने या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र टाटा एज्युकेशन ट्रस्टने निधी दिल्याने हे निलंबन मागे घेण्यात आले होते.

टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून मिळणाऱ्या निधीतून वेतन देण्यात येत असलेल्या ५५ शिक्षक आणि ६० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर जुलै महिन्यात कुऱ्हाड कोसळली होती. त्यानंतर टीसमधील शिक्षकांच्या संस्थेसह विद्यार्थी संघटनांनीही या कर्मचाऱ्यांना निलंबित करू नये यासाठी आग्रह धरला होता. टीसच्या शिक्षक संघटनेने जुलै महिन्यातच प्रशासनाला पत्र पाठवून या निलंबित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बाजू घेतली होती. हे शिक्षक विविध कॅम्पसवर पूर्ण वेळ जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अनेकांचे संशोधनही सुरू आहे. टीसच्या जडणघडणीत या शिक्षकांचा मोठे योगदान आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना असे निलंबित करणे योग्य नसल्याची भूमिका त्या वेळी शिक्षक संघटनेने मांडली होती.

हेही वाचा >>>वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवणे शक्य

आता टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून पाच कोटी रुपये निधी आल्याची माहिती टीआयएसएसमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या निधीमुळे पुढील वर्षभर म्हणजेच मार्च २०२६ पर्यंत या ११० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवणे शक्य असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. पुढील वर्ष-सव्वा वर्ष या शिक्षकांना चिंतेचे काही कारण नाही. पण या अवधीत त्यांनीही अधिकाधिक निधी, ग्रँट आणण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांचा सेवाकाळ आणखी वाढवणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.