मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रस्ता सुस्थितीत आहे असून या रस्त्यावर २७ जुलैला दुचाकीस्वाराचा मृत्यू खड्डय़ांमुळे नव्हे, तर ट्रक चालकाच्या बेदरकारपणामुळे झाला होता, असा अहवाल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात सोमवारी सादर केला.

घोडबंदर महामार्ग क्रमांक ८४ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. तो सिमेंट काँक्रीटचा असून चांगल्या स्थितीत असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे. या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला होता.  प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार, तो अपघात खड्डय़ांमुळे झाला नव्हता, तर अतिवेगाने आणि बेदरकारपणे ट्रक चालवणाऱ्या चालकामुळे झाला. ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता, असे शिणगारे यांनी अहवालात नमूद केले आहे.

हा अहवाल सादर करण्यापूर्वी, ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करण्यात आली.  त्यांच्याकडून घटनेची आणि रस्त्याची माहिती घेण्यात आली, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे. सरकारी वकील पी. पी. काकडे यांच्यामार्फत शिणगारे यांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला.

हेही वाचा>>>मुंबई: आरोग्य सेविकांचे पुन्हा ठिय्या आंदोलन; प्रलंबित मागण्यांसाठी ४ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या मुद्दा वकील रूजू ठक्कर यांनी अवमान याचिकेद्वारे उच्च न्यायालयापुढे मांडला आहे. नागरिकांसाठी खड्डेमुक्त आणि सुस्थितीतील रस्ते देण्याचे आदेश न्यायालयाने २०१८ मध्ये राज्य सरकारसह मुंबई महानगर प्रदेशातील महपालिका, विशेष प्राधिकरणांना दिले होते. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची अवस्था पावसाळय़ात अत्यंत दयनीय होत असल्याकडे ठक्कर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे.

याच याचिकेवर १२ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी ठक्कर यांनी, खड्डय़ांपासून स्वत:चा बचाव करताना दुचाकीस्वाराचा ठाणे घोडबंदर रस्त्यावर मृत्यू झाल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावर, हा रस्ता ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येत नाही तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित येत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने वरिष्ठ वकील राम आपटे यांनी केला होता. महापालिकेच्या या दाव्यावर नाराजी व्यक्त करून न्यायालयाने, ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा रस्ता कोणाच्या अखत्यारित येतो, अपघात नेमका कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा>>>एमपीएससी उत्तीर्ण अभियंत्याना वर्षभरानंतरही नियुक्तीपत्र नाही; आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण

हेतुत: उल्लंघन नाही

सुस्थितीतील रस्त्यांबाबत न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आधीच करण्यात आल्या आहेत आणि केल्या जात आहेत, असा दावा नगरविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. खड्डेमुक्त रस्ते ही आपली जबाबदारी असल्याचे मान्य करताना न्यायालयाच्या आदेशाचे हेतुत: उल्लंघन केले नसल्याचेही दोन्ही विभागांनी म्हटले आहे. शिवाय, आतापर्यंत केलेल्या उपाययोजनाही तपशीलवार नमूद केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दुचाकीस्वाराचा मृत्यू खड्डय़ांमुळे नाही’

घोडबंदर रस्ता आणि त्यावर झालेला दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू याबद्दल ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून माहिती घेण्यात आली. त्यांच्या तसेच प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार, तो अपघात खड्डय़ांमुळे झाला नव्हता, तर ट्रक चालकाच्या बेदरकारपणामुळे झाला होता, असे ठाणे जिल्हाधिकारी शिणगारे यांनी अहवालात नमूद केले आहे.