Yogi Adityanath Death Threat : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकी देणारा अनोळखी क्रमांकावरून एक संदेश प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्याप्रमाणे तुमचा शेवट करू, असा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांना शनिवारी संध्याकाळी मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला या धमकीचा संदेश एका अनोळखी क्रमांकावरून मिळाल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या धमकीचा संदेश कोणी पाठवला? यासंदर्भात पोलिसांकडून तातडीने तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहिम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

योगी आदित्यनाथ यांना याआधीही धमक्या आल्या होत्या

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या याआधीही आल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या देणाऱ्यांना अटक करत कारवाई केली होती. मात्र, यानंतर आता मुंबई पोलिसांना योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आल्याचा संदेश आल्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तब्बल १० आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता सलमान खानलाही दोन कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी आली होती. या प्रकरणात धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्यामुळे अनेकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेबाबात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.