अकोला जिल्हय़ात कडकडीत बंद, विदर्भात मराठा आंदोलनाची तीव्रता दुसऱ्या दिवशी कायम

नागपूर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विदर्भात हिंसक वळण लागले असून यवमताळ जिल्ह्य़ातील उमरखेडमध्ये पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आंदोलकांच्या दगडफेकीत ठाणेदार जखमी झाले.

उमरखेडमध्ये दुसऱ्याही दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलक आक्रमक झाल्याने वातावरण चिघळले, दगडफेकीच्या घटनाही घडल्या. जमावाला शांत करण्यासाठी गेलेले ठाणेदार सुभाष उन्हाळे दगडफेकीत जखमी झाले. अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव घटनास्थळी पोहोचले.

कोढाळीजवळ रास्ता रोको

नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळजवळ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून रस्त्यावर टायर जाळले. या आंदोलनामुळे अमरावतीकडे जाणारी व तिकडून येणारी वाहतूक अनेक तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या  रांगा लागल्या. कोंढाळी पोलिसांनी रस्त्यावरील पेटते टायर बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांना शक्य झाले नाही. आंदोलकांनी छत्रपती  शिवाजी महाराज  यांचा जयघोष करीत आरक्षणाची मागणी केली.

अकोला जिल्हय़ात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये शाळा, महाविद्यालये, पेट्रोलपंप सहभागी झाले होते. काही बँकाही बंद ठेवण्यात आल्या. बससेवाही प्रभावित झाली. जिल्हय़ात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला. वाशीम जिल्ह्यत मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम आहे. सलग दसऱ्या दिवशी विविध ठिकाणी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. कारंजा येथे पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले. त्यामध्ये वाशीम जिल्ह्यतही मंगळवारी बंद व्यापक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बुधवारी कारंजा शहरात बंद पुकारण्यात आला. कारंजा शहरातून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य केले. जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. मालेगाव तालुक्यातील केनवड, चांडस येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे नागपूर ते औरंगाबाद या द्रूतगती मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.

आंदोलनात समाजकंटक; रा. स्व. संघाचा आरोप

नागपूर : सध्या राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात समाजकंटक  शिरले आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी  येथे केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजनी शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात जोशी सहभागी झाले होते. तेथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी वरील मत मांडले. सध्या सुरू असलेल्या आंदोलनातून आरक्षण मिळवणे योग्य नाही. यात समाजकंटकांनी  शिरकाव केला असून त्यामुळे आंदोलन चिघळले आहे. या मुद्यावर शांतीपूर्वक तोडगा निघणे गरजेचे आहेम्, असे जोशी म्हणाले. या मुद्याचे राजकारण केले जात आहे का, असे त्यांना विचारले असता त्यांनी त्यावर बोलणे टाळले.