बहुभाषिक मेळाव्यात जोशी यांची रा.स्व. संघावर टीका भारत हा बहुभाषिकांचा देश असून प्रत्येक भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्या त्या भाषेचे स्वयंसेवक तयार करण्यात आले आहे. केवळ स्वयंसेवकांची संख्या वाढवताना मराठी भाषेसाठी मात्र स्वयंसेवक तयार करू शकले नाही, असे सांगत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महामंडळाच्या उपक्रमातंर्गत भाषा, साहित्य व संस्कृतीविषयक उपक्रम मालिकेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या बहुभाषिक मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विलास देशपांडे, साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, प्रकाश एदलाबादकर उपस्थित होते. भाषा ही सेंद्रिय व्यवस्था आहेत. भाषा साहित्य, संस्कृती हा विकासाचा एक भाग असून आधुनिक विकासाची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत भाषा गिळंकृत करण्यात आली आहे. उर्दू भाषेसह अन्य भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनेक त्या भाषेचे स्वयंसेवक तयार करण्यात आले आहे. मात्र, मराठी भाषेचे स्वयंसेवक तयार करण्यात आले नाही. विविध भाषिक असलेल्या भारतीय भाषांचा हा देश आहे, असेही असेही जोशी म्हणाले. भाषा संस्कृती साहित्याचे नाते जीवन प्रक्रियेशी संबंधित आहे मात्र, अशा कार्यक्रमांना लाखो रुपये वेतन घेणारे प्राध्यापक शिक्षक उपस्थित राहत नाही हे दुर्दैव आहे. प्राध्यापकांना लाखो रुपये वेतन देण्यापेक्षा २५ हजार रुपये द्यावे तेव्हा त्यांना भाषा संस्कृतीच्या विकासाची गरज काय आहे ते कळेल. आपल्या गरजा काय आहे, हेच आज कळत नसल्यामुळे मराठी भाषेची अशी अवस्था झाली आहे. एका विकास प्रक्रियेचे आपण बळी झालो आहे, असेही डॉ. जोशी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी सन्मान आणि आदर असला पाहिजे मात्र, त्यासोबतच भारतीय भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भाषेचे शिक्षण घेताना त्यात आर्थिक स्वार्थ आला आहे. स्वार्थ नाही तोपर्यंत मातृभाषेशिवाय अन्य भारतीय भाषांचे ज्ञान घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सोशल मिडियाचा भाषांवर परिणाम झाला आहे. लिपी आणि भाषा त्यामुळे नष्ट होत आहे. प्रत्येक समारंभात आपण पुष्पगुच्छ देत असतो, परंतु त्याऐवजी विविध भाषेची पुस्तके दिली तर भारतीय भाषांचा प्रचार आणि प्रसार होईल. प्रत्येक भाषेची पुस्तके वेगवेगळ्या भाषेत अनुवादित केले पाहिजे मात्र, हे आज होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक इंद्रजित ओरके यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर भाषेची समस्या- माझी भाषा या विषयावर परिचर्चा झाली. त्यात डॉ. वसंत त्रिपाठी यांनी हिंदी, प्रा. विनोद आसुदानी यांनी सिंधी, डॉ. अझहर हयात यांनी उर्दू, तर डॉ. विलास देशपांडे यांनी मराठी भाषेविषयी भाष्य केले. त्यानंतर प्रफुल शिलेदार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले. पुष्पेंद्र फाल्गुन, जहीर आलम, प्रसन्नजित गायकवाड, राजमोली अन्सुरी, सुकुमार चौधरी यांनी विविध भारतीय भाषेतील कविता सादर केल्या.