नागपूर : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास १० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी राज्यात आतापर्यंत १ लाख २ हजार जागांसाठी २ लाख ३० हजार ४९२ पालकांनी अर्ज केले आहेत.

यंदा एका पाल्याचा एकच अर्ज करण्याच्या अटीनंतरही दुपटीने अर्ज आल्याने ‘आरटीई’ प्रवेशासाठी झुंबड उडणार आहे. राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया १६ फेब्रुवारीला सुरू झाली होती. परंतु, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही शाळांची नोंदणीच पूर्ण न झाल्याने प्रवेश प्रक्रिया २३ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान सुरू झाली.  राज्यात ‘आरटीई’ अंतर्गत ९ हजार ८७ शाळांचा समावेश असून १ लाख २ हजार जागांची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी ५ मार्चपर्यंत २ लाख ३० हजारांवर अर्ज आले आहेत. म्हणजे उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ध्याहून अधिक अर्ज आल्याने प्रवेशासाठी तारांबळ उडणार आहे. याशिवाय प्रवेश अर्जासाठी आणखी पाच दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे अर्जाचा आकडा तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोनामुळे मागील वर्षांत अर्ज करण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. शाळाही ऑनलाइन असल्याने अनेक पालकांनी नव्याने प्रवेशच घेतले नाही. मात्र, यंदा आरटीई प्रवेशासाठी दिवसागणिक पंधरा हजार अर्ज प्राप्त होत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. गेल्यावर्षी सुमारे दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते.