वर्धा : दोन दिवसातील काही अपघातानंतर आता एक मोठा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. नागपूर ते मुंबई महामार्गावर एका अज्ञात ट्रकची रिक्षास धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षात बसलेले अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार,  ऑटोरिक्षा पुलगावकडे निघाली होती. त्यात आठवडी बाजार करण्यासाठी सात जण प्रवास करीत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. भरधाव  ट्रकने केळापूर जवळ रिक्षास जोरदार धडक दिली.  वेगात धडक बसल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला. तसेच दुर्गबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच करुण अंत झाला.

या अपघाताची खबर लगेच परिसरातील गावात पोहचली. केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व सहकारी घटनास्थळी धाव घेत पोहचले. त्यांनी मिळून प्रथम जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. यापैकी  भीमराव पाटील व सुनीता कोरोती यांचा उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला. ऑटोचालक सागर मराठे व अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटना स्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी पुलगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर या गावावर शोककळा  पसरली आहे.

हेही वाचा >>>नागपुरात पाच हजारांवर अवैध बांधकाम…अखेर उच्च न्यायालयाने स्वत:…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारीही एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकाचा हिंदी विद्यापीठ परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे जाळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तारले असून त्यावर सुसाट धावणाऱ्या मोठ्या वाहनांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. तसेच काही रस्त्यांवर दहा दिवसातील पावसाने  खड्डे पडले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विविध आंदोलनातून झाली. पण कुठेही अद्याप बदल दिसून आलेला नाही. हिंगणघाट, कारंजा, जाम, यवतमाळ या मार्गावर गत एक महिन्यात विविध अपघात झालेत. त्यात अनेकांचा बळी पण गेला. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठे आंदोलन केले. पण, प्रशासन ढिम्म    आहे. देवळी येथील उड्डाणपूल हा असाच धोकादायी ठरत आहे. अनेक अपघात झालेत. त्यात रविवारी रात्री झालेल्या अपघातात दोघांचा बळी गेल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. महामार्गवारील खड्डे दुरुस्ती केव्हा होणार, असा सवाल आता विचारला जात आहे.