नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) इतिहासात दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच सुरू झालेल्या आणि सर्वांत यशस्वी ठरलेल्या ‘जेईई’ व ‘नीट’ परीक्षेचा प्रशिक्षण कार्यक्रमाला यंदा अद्यापही सुरुवात झाला नाही. दहावीचा निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी होत आल्यावरही ‘बार्टी’कडून प्रशिक्षण सुरू केले जात नसल्याने अनुसूचित जातीतील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून पालकांकडून प्रशिक्षणासंदर्भात सातत्याने विचारणा केली जात आहे.

‘बार्टी’कडून ‘जेईई’ व ‘नीट’ परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी काही संस्थांची निवडही करण्यात आली. यामुळे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील बाराशे विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यात आले. दहावी उत्तीर्ण झाल्यावर हे प्रशिक्षण सुरू होते. पहिल्याच तुकडीला या प्रशिक्षणाचा मोठा फायदा झाला. यंदा बार्टीच्या जेईईसाठी ४१९ प्रशिक्षणार्थी होते. त्यापैकी जेईई मेन्समध्ये ९४ तर जेईई अॅडव्हान्समध्ये १९ प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले. या १९ विद्यार्थ्यांचा देशातील आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित आहे. बार्टीच्या वतीने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात असले, तरी ‘जेईई’ व ‘नीट’मधील यशाची टक्केवारी चांगली आहे. असे असतानाही बार्टीकडून अद्यापही हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेले नाही.

‘जेईई’ व ‘नीट’ परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी खासगी शिकवणी संस्थांकडून लाखो रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, गरीब विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही शिकवणी घेता येत न आल्याने विद्यार्थी मागे पडतात. हाच विचार करून बार्टीने प्रशिक्षण सुरू केले. असे असतानाही यावर्षी अद्यापही कार्यक्रम सुरू न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून विचारणा केली जात आहे. चांगला निकाल असताना प्रशिक्षणास विलंब होत असेल तर अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांवर ‘बार्टी’ प्रशासनाद्वारे जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. त्यामुळे तात्काळ प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी मानव अधिकार संरक्षण मंचाचे सविव आशीष फुलझेले यांनी केली. तर जेईई’ व ‘नीट’ प्रशिक्षणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे बार्टीचे महासंचावक सुनील वारे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर निकालावर परिणाम

जेईई’ व ‘नीट’ या परीक्षांसाठी दोन वर्षाचे प्रशिक्षण आवश्यक आहे. खासगी शिकवणीमध्ये दहावीची परीक्षा संपताच शिकवणी सुरू केली जाते. मात्र, बार्टीकडून जून महिना सुरू झाल्यावरही प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे प्रशिक्षण सुरू होण्यास पुन्हा विलंब होणार आहे. विद्यार्थ्यांना वेळेत प्रशिक्षण न मिळाल्यास निकालाचा टक्का कमी होण्याचा धोका आहे.