नागपूर : काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वागणुकीमुळे चर्चेत आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. बेशिस्त वर्तणूक खपवून घेतली जणार नाही, असे सर्व मंत्र्यांना सांगण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले. ते शुक्रवारी नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.

बेशिस्त वर्तणूक करेल तर खपवून घेणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई होईल, असे सगळ्यांना आम्ही तिघांनी (फडणवीस, शिंदे, पवार) सांगितले आहे. जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेत आलो आहोत. आणि ते करत असताना काय बोलतो, व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता बघत असते. त्यामुळे त्यावर अंकुश असणे आवश्यक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले तसेच ते विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा चित्रफित प्रसारित झाली. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी होणार अशी चर्चा होती. परंतु त्यांचे कृषी खाते बदलून युवक कल्याण व क्रीडा मंत्री बनवण्यात आले.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार आणि एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. कृषी खाते हे दत्ता भरणे यांना देण्यात आले आहे. आता मंत्रिमंडळात दुसरा कुठलाही बदल करण्यातबाबत चर्चा नाही, असेही फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडे यांची तिनदा भेट

माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे. प्रत्येक भेट वेगवेगळ्या कारणांसाठी होती. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजित पवार आणि एकनाथराव शिंदे करतो, असे सांगून मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाची शक्यता फेटाळली.

मतांसाठी भगवा दहशतवाद शब्दाची निर्मिती

काँग्रेसने मतांसाठी हिंदू दहशतवाद शब्द आणला. ९० च्या दशकात इस्लाम दहशतवाद जगभर होता, आजही आहे. भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादी त्यांच्या कारवाया सुरू होत्या. काँग्रेसने आपली व्होट नाराज होऊ नये म्हणून भगवा दहशतवाद आणि ‘हिंदू टेरर’ हा शब्द निर्माण केला, परंतु मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर त्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत, अशी फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.