नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपसह महायुतीने दमदार कामगिरी करत विजय प्राप्त केला. मागील आठवड्यात लागलेल्या निकालात महायुतीच्या तीन पक्षांनी मिळून दोनशेच्यावर जागा जिंकल्या. यात एकट्या भाजपने १३२ पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त केला. या दमदार विजयानंतर राज्यात तात्काळ सरकार स्थापित होऊन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र निकालाच्या दहा दिवसानंतरही राज्याचे मुख्यमंत्रीपद कुणाला मिळेल याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. यंदा मुख्यमंत्रीपद सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपच्या खात्यात जाणार हे निश्चित झाले आहे, मात्र मुख्यमंत्री कोण राहील याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. अशा स्थितीत नागपूरमध्ये जागोजागी लागलेले फलक लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या नेत्याचे संकेत देत आहेत. या फलकावर लोकांकडे बघत असलेले एक नेते गर्जना करत असल्याचे दाखविण्यात आले.

‘फिर वापस आना पडता है…’

शहरातील शंकरनगर चौकात लागलेल्या एका फलकावर लोकांकडे बघत असलेले एक नेते गर्जना करत असल्याचे दाखविण्यात आले. यात हिंदीमध्ये ‘वापस आना पडता है, फिर वापस आना पडता है ‘ अशाप्रकारचे हिंदीतील वाक्य लिहिले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या फलकावर कोणत्याही पक्षाचे, संस्थेचे किंवा व्यक्तीचे नाव नाही. केवळ एका चित्रासह हिंदी भाषेतील ओळी लिहिण्यात आल्या आहेत. ‘पत्थर की बंदिश से भी क्या नदिया रुकती है, हालातो की धमकी से क्या अपनी नजरे झुकती है, किस्मत से हर पन्ने पर किस्मत लिखवाना पडता है, जिसमे मशाल सा जज्बा हो, वो दीप जलाना पडता है, वापस आना पडता है, फिर से वापस आना पडता है…’ अशाप्रकारच्या या ओळी आहे. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर चर्चेचे विषय ठरत आहे.

हेही वाचा : नागपूरकरांचे फोन लागेना, ऑनलाईन पेमेंट देखील होईना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मी पुन्हा येईल…’

अशाप्रकारचे एक दुसरे बॅनर घाटरोड चौकात बघायला मिळाले. यात देखील एक नेता लोकांकडे बघत जोरदार गर्जना करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मी पुन्हा येईल… या शीर्षकाखाली पुन्हा का येईल याची विविध कारणे सांगण्यात आली आहेत. यात गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, युवकांना अधिक सक्षम करण्यासाठी पुन्हा येईल असे दर्शविण्यात आले आहे. ‘नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी …मी पुन्हा येईल…’ हे बॅनर देखील लक्षवेधी ठरत आहे.