नागपूर : भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरणमध्ये स्वदेशी बनावटीच्या पिनाका क्षेपणास्त्राचा अलीकडेच सराव केला होता. ते आता पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर सज्ज करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसज्जता करण्यात आली आहे. पिनाका क्षेपणास्त्र संपूर्णत: भारतीय बनावटीचे असून प्रचंड शक्तिशाली आहे. त्याची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) केली असून प्रारंभी नागपूर आणि विदर्भातील आयुध निर्माणीत त्याचे उत्पादन झाले. आता त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीला देखील उत्पादन करण्याचे काम देण्यात आले आहे.

पिनाका क्षेपणास्त्रात केवळ ४४ सेकंदात ७२ रॉकेट लॉन्च करण्याची क्षमता आहे. तसेच ६० ते ९० किलोमीटरपर्यंत मारा करता येतो. शिवाय अचूक लक्ष्य टिपले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा भाग आहे. भारताकडे वार्षिक ५ हजारपेक्षा अधिक क्षेपणास्त्र निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे अधिक काळ चालणाऱ्या युद्धासाठी त्यांची उपलब्धता होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या युद्धातही पिनाकाचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

शत्रूला धडकी भरवण्यासाठी सराव

पिनाका क्षेपणास्त्राच्या वेगवेळ्या आवृत्त्या तयार आहेत. नवीन आवृत्ती ९० किलोमीटरपर्यंचे लक्ष्य गाठू शकते. एकाचवेळी अनेक रॉकेट सोडता येतात. युद्धाच्यावेळी लक्ष्यावर हल्लाबोल करणे हे या क्षेपणास्त्राचे प्रमुख काम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी पाकिस्तानाविरुद्ध भारताची तयारी दर्शवण्यासाठी त्याचा सराव करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.