नागपूर : रस्त्यावरील भटक्या श्वानाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. एकीकडे श्वानांच्या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जात आहे, तर दुसरीकडे वाहनांच्या मागे धावल्यामुळे अपघात होऊन माणसे मृत्युमुखी पडत आहेत. त्याचवेळी श्वानांवर होणाऱ्या अत्याचारात देखील वाढ होत आहे. शहरातील श्वानप्रेमी श्वानांवरील अत्याचाराचा मुद्दा उचलून धरत असताना श्वानांकडून लहान मुलांवर, नागरिकांवर होणारे हल्ले त्यांच्याकडून दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजू लक्षात घेता आता श्वानांसाठी नवीन निवारा उभारण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे.

नागपूर शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी नागपूर महापालिका वाठोडा परिसरात आधुनिक सुविधांनी सुसज्ज ‘श्वान निवारा केंद्र’ स्थापन करणार आहे. या प्रकल्पासाठी नागपूर महापालिकेने सहा कोटी ८९ लाख ६७ हजार २८१ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. वाठोडा परिसरातील श्वान निवारा केंद्राच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी नागपूर महापालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

सध्याच्या केंद्रात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने, श्वानांची सुरळीत काळजी आणि निवारा सुनिश्चित करण्यासाठी महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार वाठोडा परिसरातील श्वान निवारा केंद्राच्या सुविधा मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन आधुनिक श्वानांसाठी निवारा केंद्र तीन एकर जागेत उभारले जाईल. त्यात सुमारे २०० श्वानांची काळजी घेण्याची क्षमता असेल. या सुविधेत श्वान आणि पिल्लांसाठी स्वतंत्र निवारागृहे, आयसोलेशन शेड, श्वानांच्या स्वच्छतेच्या सुविधा, आधुनिक रुग्णालय, खेळाचे मैदान, स्वयंपाकघर, दुकान आणि प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा असतील. या प्रकल्पाचे वास्तुशिल्प रचना श्रीपाद दुबे यांनी केली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ॲक्सिनो कॅपिटल सर्व्हिसेस आणि श्रीपाद दुबे आर्किटेक्ट्सची निवड करण्यात आली आहे.

रस्त्यावरील कुत्र्यांना राहणीमान आणि प्राणी कल्याणाच्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे पुरवण्याच्या दिशेने महापालिकेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल असेल. या प्रकल्पाला महापालिकेने तांत्रिक मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणसांचेही घर नसेल एवढा अत्याधुनिक निवारा या श्वानांसाठी बांधला जात आहे. त्यासाठी महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करत आहेत. मात्र, असे असले तरी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटणार आहे का, हा प्रश्नच आहे. श्वानांना पकडण्यासाठी महापालिकेचे वाहन आले तरी श्वानांना सुगावा लागतो आणि क्षणार्धात श्वान त्याठिकाणातून गायब होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी निवारा उभारला तरी त्या निवाऱ्यात त्यांना पोहोचवण्याकरिता त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.