• रविवारी ११ पालिकांसाठी मतदान
  • चौथ्या टप्प्यात प्रतिष्ठा पणाला

राज्यातील इतर ठिकाणी झालेल्या पालिका निवडणुकीत सुरू असलेली भाजपच्या विजयाची घोडदौड नागपूरमध्ये कायम ठेवण्याचे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार गोपाळदास अगरवाल आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी गोंदियातील पालिका निवडणूक राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

पालिका निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नागपूर विभागात नागपूर जिल्ह्य़ातील ९ पालिकांमध्ये तर गोंदिया जिल्ह्य़ातील गोंदिया आणि तिरोडा या दोन अशा एकूण ११ पालिकांसाठी ८ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. नागपूर जिल्ह्य़ातील पालिका निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा आहे. या दोन्ही नेत्यांनी स्वत: निवडणुकीत लक्ष घातले आहे. पालिका निवडणुकीत राज्यात कुठेही प्रचाराला न गेलेल्या गडकरी यांनी मंगळवारी जिल्ह्य़ात एका दिवसात आठ सभा घेतल्या. फडणवीस यांच्याही प्रचार सभा पुढच्या काळात होणार आहेत. बावनकुळे यांनी तर जिल्ह्य़ात ठाणच मांडले आहे. यावरून भाजपने या निवडणुका किती गाभीर्याने घेतल्या आहेत याची प्रचीती येते. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याकडे मोठा नेता प्रचारासाठी नाही.

जिल्ह्य़ातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघांत या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यापैकी चार ठिकाणी भाजपचे तर एका ठिकाणी (सावनेर) काँग्रेसचा आमदार आहे. ९ पैकी मोहपा आणि कळमेश्वरमध्ये काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत युती आहे. भाजप आणि सेनाही स्वतंत्रपणे लढत आहेत. स्थानिक आघाडय़ा, बहुजन समाज पार्टी रिंगणात आहेत. भाजपची प्रचार सूत्रे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत, पक्षातील सर्व गटांना एकत्रित करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. काँग्रेसला गटबाजीची लागण आहे, राष्ट्रवादीचा जिल्ह्य़ात मर्यादित प्रभाव आहे. शिवसेनेची शक्ती रामटेक, कळमेश्वर याच पालिकेत आहे. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक आणि पक्षाचे आमदार सुनील केदार यांनी, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्रीद्वय अनिल देशमुख आणि रमेश बंग यांनी प्रचारधुरा सांभाळली आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड पालिकेची निवडणूक राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि तेथील विद्यमान आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. काटोल हा अनिल देशमुख यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पूर्वी येथे राष्ट्रवादीचीच सत्ता होती, सध्या भाजपकडे आहे. या भागातील शेकापचे माजी आमदार वीरेंद्र देशमुख यांचे पुत्र राहुल यांचाही गट येथे सक्रिय आहे. माजी नगराध्यक्ष चरणसिंह ठाकूर यांचाही गट निवडणूक रिंगणात आहे. ठाकूर पूर्वी भाजपमध्ये होते, आता त्यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. नरखेडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे.

सावनेर मतदारसंघात सावनेर, कळमेश्वर, मोहपा आणि खापा या चार पालिकांमध्ये निवडणुका आहेत. मोहपा आणि खाप्यात सध्या काँग्रेसची तर सावनेरमध्ये भाजपची सत्ता आहे. कळमेश्वरमध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेत आहे. कळमेश्वर पालिकेत अनेक वर्षांपासून असलेली भाजप-सेनेची युतीही या वेळी भंग झाली आहे. या भागाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. केदारांच्या विरुद्ध भाजपने सर्व शक्ती एकवटली आहे. कळमेश्वरमध्ये शिवसेनेचे स्वबळावर लढणे भाजपसाठी अडचणी निर्माण करणारे आहे.

party-chart

उमरेडमध्ये या भागाचे भाजपचे आमदार सुधीर पारवे आणि काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या या पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. मुळक यांचा या मतदारसंघाशी कायम संपर्क राहिला आहे. येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. राष्ट्रवादी आणि सेनाही रिंगणात आहेत. रामटेक पालिकेत चौरंगी लढत आहे.

जिल्ह्य़ातील सर्वाचे लक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठी पालिकेकडे लागले आहे. येथे भाजपने सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत युती केली आहे. ही निवडणूक बावनकुळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पालकमंत्र्यांनी कामठीच्या विकासासाठी खेचून आणलेला निधी हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. काँग्रेसने येथे सर्व शक्ती पणाला लावली आहे.

गोंदिया तिरोडा पालिकेत चुरस

गोंदिया जिल्ह्य़ातील गोंदिया आणि तिरोडा या दोन पालिकांमध्ये निवडणुका आहेत.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वादाचा फायदा यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी मतदारसंघात भाजपला झाला होता. गोंदिया पालिकेत काँग्रेसची सत्ता होती, काही नगरसेवक अपात्र ठरल्याने भाजपचा नगराध्यक्ष झाला. सध्या भाजपने येथे जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. खासदार नाना पटोले, आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात भाजप ही निवडणूक लढवीत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी पटेल यांच्या सभा झाल्या आहेत. ही निवडणूक पटेल यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरणारी आहे. कारण भंडारा आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. तिरोडय़ात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे.