नागपूर : संसदेत बोलणाऱ्या खासदारांना निलंबित केले जाते. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरील विधेयके विनाचर्चा पारित केली जातात. याचा अर्थ देशात लोकशाही संकटात आहे. ती वाचवण्याचा शंखनाद नागपूरमध्ये २८ डिसेंबरला होणाऱ्या जाहीर सभेतून केला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
लोकसत्ता कार्यालयाला पटोले यांनी मंगळवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पटोले म्हणाले, काँग्रेसचा स्थापना दिन साजरा करण्याची महाराष्ट्राला मिळालेली ही एक सुवर्ण संधी आहे. या निमित्ताने पक्षाचा प्रदेश काँग्रेसवर असलेला विश्वास दिसून येतो. सभेला लाखो लोक येतील असा पोलिसांचा अंदाज आहे. संपूर्ण देशातून सभेसाठी काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री व अन्य प्रमुख नेते येणार आहेत. सोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. नागपूर ही राजकीय चळवळीची भूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९२० मध्ये नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनातून स्वातंत्र्याच्या लढाईला बळ मिळाले होते. आता देशात लोकशाही संकटात असून ती वाचवण्याचा संदेश येथील सभेतून दिला जाणार आहे.
हेही वाचा >>>बहुगुणी क्विनोवा शेतीचा अनोखा प्रयोग, भरगोस उत्पादन कमी पाण्यात अन् कमी खर्चात!
पटोले म्हणाले, देशात अस्वस्थता आहे. संसदेची सुरक्षा धोक्यात आली. त्याबाबत लोकसभा-राज्यसभेत बोलणाऱ्यांना निलंबित करण्यात आले. सभागृहात गैरहजर असणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. महत्त्वाच्या विषयांवरील (भारतीय न्याय संहिता) विधेयके विनाचर्चा पारित केली. सुधारित कायदे काही विशिष्ट लोकांनाच लागू होतील. त्यामुळे चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थाच संपवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थापना दिनी नागपूरमध्ये होणाऱ्या सभेचे महत्त्व अधिक आहे. काँग्रेस लोकशाही वाचवण्यासाठी धडपड करीत आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षच नको आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागपूरच्या जाहीर सभेतून संदेश दिला जाणार आहे. येथून संदेश देशभर जाईल, व लोकशाही संपवू पाहणारी व्यवस्था लोक झुगारून देतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>“मराठा-ओबीसी वादामुळे अशांतता ,५० हजारांहून अधिक उद्योग ” काय म्हणाले पटोले
पक्षांतर्गत वादाबाबत बोलताना कुटुंबात वाद होतच असतात, सर्वांना सोबत घेऊनच चालावे लागते, असे सांगताना पटोले यांनी पक्ष सोडून कोणी गेले तरी त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही, असे स्पष्ट केले. भाजपच्या प्रचाराला उत्तर देणार नाही कारण त्यांच्या सापळ्यात आम्हाला अडकायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.
पक्ष सांगेल तर नागपुरातून लढणार
आगामी लोकसभा निवडणूक नागपूरमधून लढणार का, असा सवाल पटोले यांना केला असता त्यांनी पक्ष सांगेल तर लढणार, असे उत्तर दिले. २०१४ मध्ये ऐनवेळी पक्षाने नागपूरमधून निवडणूक लढवण्यास सांगितले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सरकारकडून केवळ घोषणा
केंद्र व राज्यातील सरकार रोज केवळ नवनवीन घोषणा करते. पहिल्या घोषणेचे काय झाले याचा दुसरी घोषणा करताना विसर पडतो. ‘लांडगा आला रे आला’ अशी या सरकारची अवस्था झाली आहे. सरकार काम करीत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे धाडस का दाखवत नाही, असा सवाल पटोले यांनी केला.
पाच प्रमुख मुद्यांवर लक्ष केंद्रित
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना न्याय, आरोग्य सुविधेत वाढ, सर्वांसाठी शिक्षण, रोजगार संधी आणि उद्याोग विकास या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून काँग्रेस लोकांपुढे जाणार आहे. विद्यामान सरकारच्या धोरणामुळे शेतकरी संकटात आहे, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, मिहानचा विकास रखडला आहे, शाळा बंद केल्या जात आहे आणि आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.