scorecardresearch

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने सरकारचे धिंडवडे निघाले, आमदार खडसेंचे टीकास्त्र, गोपीनाथ मुंडेंबद्दल केले ‘हे’  गौप्यस्फोट…

निवडणुकांमध्ये प्रभावी ओबीसी चेहरा हवा म्हणून पंकजा मुंडे यांना मतासाठी पुढे करण्यात येऊ शकते अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

mla Eknath Khadse
एकनाथ खडसे

बुलढाणा : सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ‘नपुसंक’ या शब्दात केलेल्या भाष्यमुळे सरकारचे धिंडवडे निघाले असल्याचे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. दिवंगत पित्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांची पक्षात डावलले जात असल्याचा आरोप करून त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल दोन गौप्यस्फोट देखील केले.

आज शुक्रवारी मलकापूर येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना परखड वार्तालाप केला. सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हणून या सरकारचे धिंडवडे उडवले आहेत. ती  त्यांच्यासाठी सणसणीत चपराक असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बुलढाणा : मूक मोर्चातून काँग्रेसचा दडपशाहीविरुद्ध ‘आवाज’! हुतात्मा स्मारक परिसरात सत्याग्रहद्वारे निषेध

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्धल विचारणा केली असता त्यांचीही पक्षात उपेक्षा केली जात असल्याचे ते म्हणाले.भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे.  अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर , गोपीनाथ मुंडे  यासारख्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये अपमान सहन करावा लागला. त्यांना त्रास देण्यात आला. अलीकडच्या काळात  एकनाथ खडसे , पंकजा मुंडे यांचीही छळवणूक करण्यात आली .आतापर्यंत पंकजा ताईंना भाजपने अपमानास्पद वागणुक दिली. 

हेही वाचा >>> मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र

मात्र आता निवडणुकांमध्ये प्रभावी ओबीसी चेहरा हवा म्हणून पंकजा मुंडे यांना मतासाठी पुढे करण्यात येऊ शकते अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. त्या सक्षम ओबीसी नेत्या ,  गोपीनाथ मुंडे च्या कन्या आहेत  आणि त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग राज्यात आहे . आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे ‘त्यांना’ ओबीसी चेहरा पाहिजे , पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे.

पहाटेचे चार आणि पक्षत्यागाचा विचार

गोपीनाथ मुंडे आणि मी तीस-पस्तीस वर्षे एकत्र काम केलं.त्यावेळी मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला आमच्यामुळे सर्वसामान्यांच्या पक्ष म्हणून ओळख मिळाली. पूर्वी भाजपमध्ये ओबीसींना घेत सुद्धा नव्हते. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने किती त्रास दिला हे मला माहिती आहे.  त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यास भाग पाडलं. मध्यंतरी त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा आला होता, असे गौप्यस्फोट त्यांनी या चर्चेत केले. आता तीच परिस्थिती  पंकजा मुंडेंवर ओढावलेली आहे.  भाजपने सातत्याने ओबीसींवर अन्याय करण्याची नीती अवलंबली पण  ओबीसींनी पक्ष वाढवण्यासाठी मदतच केल्याची खंत या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या